गोरखपूर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये बीआरडी मेडिकल कॉलेज रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यानं तब्बल 30 मुलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या मुलांचे मृत्यू मागील 36 ते 48 तासात झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे 9 ऑगस्टलाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बीआरडी मेडिकल कॉलेजचा पाहणी दौरा केला होता.


बिल थकवल्यानं ऑक्सिजनचा पुरवठा बंद

66 लाखांचं बील थकवण्यात आल्यानं ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या फर्मनं काल रात्रीपासूनच हा ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला होता. लिक्विड ऑक्सिजन देखील गुरुवारपासून बंद होते. त्यात आज सगळे सिलेंडरही संपले. एनएनयू वॉर्डमध्ये दाखल असलेल्या 10 तर इन्सेफेलाइट्स वॉर्डमधील 12 बालकांचा मृत्यू झाला. दरम्यान यानंतरही रुग्णालय ऑक्सिजनची तरतूद न करू शकल्यानं मृतांचा आकडा 30 वर पोहोचला.

निष्काळजीपणामुळे 30 मुलांचा बळी

मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठा करणाऱ्या कंपनीचं नाव पुष्पा अॅण्ड सन्स असल्याचं समजतं आहे. अनेक रिपोर्टनुसार, मेडिकल कॉलेजमध्ये सेंट्रल पाइपलाईननं लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. पण गुरुवारी अचानक हा पुरवठा थांबवण्यात आला.

रुग्णालयातील आयसीयू आणि दुसऱ्या वॉर्डमध्ये काल रात्री 11.30 वा. ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आला. जो आज सकाळी नऊ वाजेपर्यंत कायम होता. हा पुरवठा थांबलं असल्याचं माहित असूनही ऑक्सिजनची दुसरी कोणतीही व्यवस्था केली नाही. यामुळे रुग्णालयातील 30 मुलांचा हकनाक बळी गेला.

दरम्यान, 9 ऑगस्टलाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या रुग्णालयाची पाहणीही केली होती. याबाबतचं ट्वीट देखील त्यांनी केलं होतं.


30 मुलांचा हकनाक बळी घेणाऱ्या घेणाऱ्या कंपनी आणि रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.