मुंबई : प्रदूषणाची सर्वोच्च पातळी गाठूनही त्यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेल्या देशभरातील 102 शहरांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तातडीने 'अॅक्शन प्लान' देण्याची सूचना दिली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर अशा 17 शहरांची हवा नागरिकांसाठी घातक ठरत आहे. आश्चर्य म्हणजे यामध्ये 43 स्मार्ट सिटींचा समावेश आहे.


घातक हवा असलेल्या देशभरातील 102 शहरांची यादी केंद्राने चार महिन्यांपूर्वी जाहीर केली होती. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 'राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम' गुरुवारी सुरु केला. त्यावेळी, या 102 शहरांतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासनांनी तातडीने कृती योजना आराखडा सादर करावा, असं सांगण्यात आलं.

पुणे, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरातील नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण सर्वाधिक (घातक पातळी) असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितलं. तर विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर ही सर्वात प्रदूषित शहरं आहेत.


गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रदूषित शहरांची यादी सादर करुनही त्याची गांभीर्याने दखल न घेतली गेल्याबद्दल सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमरावती, जालना, कोल्हापूर आणि लातूर या शहरांनी अॅक्शन प्लान दिले होते, मात्र ते फेटाळल्यानंतर त्यांचं पुनर्सादरीकरण केलं गेलं नाही.

केंद्राने निश्चित केलेल्या मानकानुसार, ‘पार्टिक्युलेट मॅटर 10’ चं वार्षिक सरासरी प्रमाण 60 आणि नायट्रोजन डॉयऑक्साइडचं वार्षिक सरासरी प्रमाण 40 पेक्षा अधिक असल्यास त्या शहरांना प्रदूषित शहर म्हटलं जातं.


सर्वात प्रदूषित महाराष्ट्रातील 17 शहरं कोणती?

मुंबई,
नवी मुंबई,
बदलापूर,
उल्हासनगर,
पुणे,
नाशिक,
जळगाव,
औरंगाबाद,
कोल्हापूर,
सांगली,
सोलापूर,
जालना,
नागपूर,
अमरावती,
अकोला,
चंद्रपूर,
लातूर

महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशचा नंबर

महाराष्ट्रानंतर प्रदूषणात उत्तर प्रदेशचा नंबर लागला आहे. कारण उत्तर प्रदेशातील पंधरा शहरं सर्वाधिक प्रदूषित आहेत. तर पंजाबमधील आठ, हिमाचल प्रदेशामधील सात शहरांचा समावेश आहे. गुजरातमधील सूरत, तामिळनाडूमधील तुतीकोरीन, कर्नाटकातील चार आणि आंध्र प्रदेशातील पाच शहरं प्रदूषित आहेत.