बंगळुरू :  कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील सुलीवादी गावात एका मंदिरातील प्रसाद खाल्ल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 90 लोकांवर उपचार सुरु असून 11 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी दवाखान्यात दाखल केलेल्या बाधितांची भेट घेतली. पोलिसांनी मंदिर व्यवस्थापनातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. गुरुवारी सकाळी मरम्मा मंदिराच्या  कोनशिला अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसादाचे वाटप केले होते.


मंदिरातील प्रसादात विष घातले असल्यामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. प्रसादाचे नमुने चौकशीसाठी घेतले असून ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रसाद खाल्ल्यानंतर लोकांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. यानंतर या लोकांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 13 लोकांचा मृत्यू झाला तर 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी पिडीतांवर उपचारासाठी योग्य नियोजन  करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आदेशही दिले आहेत. काही पीडितांच्या मते प्रसादामध्ये केरोसीनसारखा वास येत होता. मात्र याकडे दुर्लक्ष करत या सर्वांनी प्रसाद खाल्ला.