सुमारे 97 टक्के कोरोनाबाधित बरे झाले असून त्यापैकी चार जण कोरोनामुळं मरण पावले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. केरळ राज्यात एका महिन्यापूर्वी 300 कोरोना केसेस होत्या. गेल्या बुधवारी कोरोना संक्रमितांची संख्या 30 वर आली होती. काही आठवड्यांपूर्वी राज्यात 100 हून अधिक हॉटस्पॉट होते तर आता केवळ 33 हॉटस्पॉट आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
केरळमधील एरनाकुलम जिल्ह्यातील एकमेव नवीन रुग्ण सापडला आहे. त्याचा तामिळनाडूमधील चेन्नई इथून प्रवासाचा इतिहास आहे, असे मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले.
केरळच्या त्रिशूर येथे भारतातील पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. तो रुग्ण सापडल्यापासून कालचा 100 वा दिवस होता. मार्चच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये विदेशातून आलेल्या लोकांमुळं कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. मात्र दोन महिन्यानंतर आम्ही कोरोना नियंत्रणात आणला आहे, असं विजयन म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात 20,157 लोक निरीक्षणाखाली आहेत, त्यातील 347 रुग्णालयात आहेत. राज्यात आतापर्यंत 35,856 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी 35,355 कोविड -19 साठी निगेटिव्ह आले आहेत, असं मुख्यमत्री विजयन यांनी सांगितलं.
केरळमध्येच देशातील पहिला करोनाची लागण झालेला रुग्ण आढळला होता. 30 जानेवारीला केरळमधील त्रिशूर येथे हा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर केरळमध्ये रुग्णांची संख्या जलद गतीने वाढत गेली. सुरुवातीच्या काळात केरळ आणि महाराष्ट्र ही राज्य कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत सर्वात आघाडीवर होती. रुग्णसंख्या वाढत असताना केरळने उपचारांच्या साधनांवर लक्ष केंद्रीत केले आणि मृत्यू नियंत्रणात ठेवले. रुग्णांची संख्या मोठी असतानाही केरळमध्ये केवळ 4 मृत्यू झाले आहेत. यामुळे जगभरात केरळच्या उपाययोजनांची प्रशंसा होत आहे.