मुंबई: आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष  (Azadi Ka Amrit Mahotsav) उलटून गेली आहेत. मात्र देशातील काही भाग मात्र अद्याप पारतंत्र्यांतच आहेत की काय? असा सवाल उपस्थित होतोय. गडचिरोली (Gadchiroli) भागात हेमलकसा (Hemalkasa) आणि भामरागड (Bhamragad) परिसरात आजही रस्ते, पूल, वीज आणि मोबाईल नेटवर्क नाहीये. स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी उलटली तरीही दुर्गम भागातील उपेक्षा अजूनही संपलेली दिसत नाही. नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी आजही मोठ्या जिकरीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे हीच परिस्थिती  ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे (Prakash Amte) यांनी सोशल मीडियाद्वारे मांडली आहे. अमृत महोत्सव साजरा करताना इकडे लक्ष द्यायला पाहिजे अशी देखील सरकार प्रशासनाकडे त्यांनी विनंती केली आहे.


स्वातंत्र्यपूर्व काळापासून गडचिरोलीचा काही दुर्गम भाग दळणवळणाच्या सुविधांपासून वंचित आहे. हा दुर्गम भाग मोबाईल नेटवर्कपासून वंचित आहे. मोबाईलला रेंज नसल्याने विद्यार्थी तसेच शासकीय योजनांचा ऑनलाईन लाभ घेण्यासाठी रहिवाशांना, स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन शिक्षण, बँकिंग व इतर सुविधांपासून वर्षानुवर्षे खेडीपाडी वंचित आहेत. तसेच रस्ते, पुल, लाईट नसल्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना गेल्या अनेक वर्षांपासून सामोरे जावे लागत आहे.


यासंदर्भात  प्रकाश आमटे प्रशासनाकडे विनंती केली आहे. आमटे म्हणाले, कठीण आहे जीवन. दुर्गम भागात अजूनही रस्ते पूल नाहीत. पावसाळ्यात तीन ते चार महिने जगाशी संपर्क तुटतो. आझादी का अमृत महोत्सव साजरा करतांना इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यावर्षी तरी लक्ष घालून रस्ते, पुल, लाईट आणि मोबाईल नेटवर्क सगळीकडे पोहोचविण्यात यावे. अतिमागास - अतिदुर्गम हा शिक्का पुसला गेला पाहिजे असे काम व्हायला हवे. विनंती आहे प्रशासन, शासन, लोक प्रतिनिधी यांनी यावर तोडगा काढावा. 


पुढे आमटे सांगतात की, पावसाळ्याच्या चार महिन्यात अशा दुर्गम भागात रस्ते पूल नसल्याने आरोग्य सुविधा पोहोचवणे अशक्य होते. प्रशासनाला सुद्धा शक्य होत नाही. रुग्णाला सुद्धा दवाखान्यात येणे अवघड होऊन बसते. रस्ते नसल्याने अनेकांचा जीव देखील गेला आहे. 12 महिने  रस्ते झाले तर हे मृत्यू टळू शकतील. आरोग्य सेवक, शिक्षक यांनी दुर्गम भागात जाऊन काम करणे अपेक्षित आहे. पण रस्ते, पूल, वीज, मोबाईल नेटवर्क नसल्याने कोणीही चांगली सेवा देत नाहीत.


 लाकडाचे व बांबूचे पूल दरवर्षी ऑक्टोबरमध्ये गावातील जनता बनविते. किमान त्यावरून चालत, सायकलने आणि बाईकने जाणे शक्य होते. 40-50 किलोमिटर दूर उंच डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात येत असतात. छत्तीसगड मधील अबुजमाड भागातील अनेक आदिवासी बांधव भामरागड भागात ट्रीटमेंटसाठी किंवा बाजार करण्यासाठी येत असतात. 40-50 किलोमिटरचा प्रवास ते चालत करतात. डोंगर असल्याने पायवाटेने प्रवास करतात असे आमटे सांगतात.


त्यामुळे देशात आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना ही परिस्थिती फार वेदनादायक आहे. समाज सुधारक प्रशासनाच्याही परिस्थिती वेळोवेळी लक्षात आणत आहेत . त्यामध्ये पुन्हा एकदा प्रकाश आमटे यांनी ही स्थिती नव्या सरकार आणि प्रशासनाच्या लक्षात यावी यासाठी पुढे आणली आहे त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार आता नक्की काय पाऊल उचलत हे पुढील काळात पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.