गडचिरोली : एखाद्या ठिकाणी जमिनीच्या आत संपूर्ण क्षेत्राच्या समृद्धीचा प्रचंड मोठा खजिना दडलेला असल्याचे तब्बल 60 वर्षांपासून माहीत असेल, तरीही त्या भागातील लोकांना मागास राहावे लागत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार? नक्षलवादामुळे गडचिरोली जिल्ह्यासोबत तसेच घडले आहे. देशातील सर्वात उच्च प्रतीचा लोहखनिज गडचिरोलीतील सुरजागड टेकड्यांमध्ये दडलेला असल्याची माहिती 1960 पासून उपलब्ध होती. मात्र नक्षलवादामुळे त्या लोह खनिजाचे वापर करणे शक्य नव्हते. आता बदललेल्या परिस्थितीत केवळ सुरजागड खाणीतून लोह खनिजाचे उत्खननच होत नाही आहे तर गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे लोह पोलाद प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील 40 दिवसात सुरू होणार आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण विदर्भ स्टील उत्पादनाचा हब बनेल असा विश्वास निर्माण झाला आहे.


गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या एटापल्ली तालुक्यात सुरजागड टेकड्या आहेत. घनदाट जंगल असलेल्या या उंच टेकड्यांच्या पोटात देशातील सर्वात उच्च प्रतीचा कोट्यवधी टन लोह खनिज दडलेला आहे. मात्र हा शोध काही आता लागलेला नाही, तर 1960 पासून खनिज संशोधन संस्थांच्या अहवालात ही माहिती उपलब्ध होती. मात्र, गडचिरोलीतील नक्षलवादामुळे तिथे पाय ठेवणे ही शक्य नव्हते. 2015 मध्ये सरकारने सुरजागडमध्ये लोह खनिजाच्या उत्खननाचा निर्णय घेतला. मात्र, काम सुरु होताच 2017 मध्ये नक्षलवाद्यांनी सुरजागड जवळ कंत्राटदारांच्या शंभर पेक्षा जास्त गाड्या जाळून टाकल्या. पुन्हा एकदा काम थांबले. 
 
सुरजागड सुरक्षित करण्यासाठी पोलिसांनी खास रणनीती राबविली. सर्वात आधी सुरजागडच्या अवतीभवती हेडरी, येलचिल, अलदांडी, पिपली बुर्गी आणि सुरजागड या ठिकाणी नवे पोलीस मदत केंद्र उभारले. संपूर्ण परिसरात नक्षलवाद्यांचा नाही तर पोलिसांचा दबदबा निर्माण झाला आणि सुरजागड नक्षलवाद्यांच्या नियंत्रणातून मुक्त झाले.


संपूर्ण परिसरात सुरक्षितता निर्माण झाल्यानंतर लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने सुरजागडमध्ये उत्खननाचे काम सुरु केले. स्थानिकांच्या मनातील भीती नाहीशी होऊन लोक कामावर यायला लागले. लॉयड्स मेटल्स एन्ड एनर्जीचे मॅनेजिंग डायरेक्टर बी प्रभाकरन यांच्या मते सुरजागड मधील लोह खनिज छत्तीसगड आणि ओडिसाच्या देशातील सर्वोत्तम लोहखनिजाच्या तोडीस तोड आहे. भारतात लोहपोलादाचा (steel ) सर्वात मोठा बाजार महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात आहे. त्यामुळे छत्तीसगड आणि ओडिसाच्या खाणींच्या तुलनेत सुरजागडची खाण स्ट्रेटेजिकली अचूक ठिकाणी आहे आणि येणाऱ्या काळात त्याचाच मोठा फायदा  महाराष्ट्रातील लोह पोलाद प्रकल्पांना मिळेल. गडचिरोली जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण विदर्भ स्टील उत्पादनाचा हब बनेल असा दावा त्यांनी केला दावा आहे.


मात्र, सुरजागड मधून डोंगर पोखरून सर्व लोह खनिज  इतर जिल्ह्यात आणि राज्याच्या बाहेर चालला आहे असे नाही. तर सुरजागडच्या लोह खनिजाच्या आधारावर गडचिरोली जिल्ह्यातच लोह पोलाद कारखाना सुरु करण्यात यावा अशी अट घालण्यात आली होती आणि त्याची फलनिष्पत्ती आता कोनसरीच्या लोह पोलाद कारखान्याच्या रूपात समोर आली आहे.       


- कोनसरी लोह पोलाद कारखाना तीन टप्प्यात सुरू होईल.
- पहिला टप्पा पुढील 40 ते 60 दिवसात.
- दुसरा टप्पा डिसेंबर 2024 पर्यंत. 
- तिसरा टप्पा डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होईल.
- तर पुढील पाच वर्षात तीन दशलक्ष टन क्षमतेचा आणखी एक पोलाद कारखाना गडचिरोलीत उभारण्याची योजना आहे.
- वीस हजार कोटींची गुंतवणूक या तीन टप्प्यांमधून होईल.
- परिणामी गडचिरोली जिल्ह्यातच 8 दशलक्ष टन लोहखनिजाचा वापर होऊन लोहपोलाद उत्पादन सुरू होईल.
- उर्वरित लोह खनिज विदर्भ आणि महाराष्ट्रातील छोट्या लोह पोलाद कारखान्यांना दिला जाईल.
- त्यामुळे एकट्या गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच वर्षात 20 हजार ते 30 हजार रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे. 


दरम्यान, गडचिरोलीत सुरजागड मधील लोह खनिज आणि कोनसरीत होऊ घातलेला लोह पोलाद कारखाना एवढंच औद्योगिकीकरण होणार आहे असे नाही. कोनसरीच्या लोह पोलाद कारखान्याचे तिन्ही टप्पे पूर्ण होण्याच्या आधीच छोट्या साहायक उद्योगांचे आगमन ही सुरु झाले आहे. लवकरच अहेरी तालुक्यात वडलापेठ येथे टीएमटी रॉड्सच्या कारखान्यासाठी उद्योजजकांकडून काम सुरु होणार आहे.


सर्व काही असून ही फक्त नक्षलवादामुळे अनेक दशके औद्योगिकीकरण सुरु न होऊ शकल्याने काय नुकसान झाले आहे.. हे आता स्थानिकांना समजायला लागले आहे. त्यामुळे भविष्यात मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी लोकांना एका नव्या गडचिरोलीचे चाहूल वाटत आहे.
   
सुरजागडचा लोह खनिज आणि त्या आधारावर येणारे लोह पोलाद कारखाने आणि त्यांचे सहायक उद्योग गडचिरोलीचा भाग्य बदलतील असे दावे केले जात असले तरी हे सर्व गडचिरोलीत सध्या दिसत असलेली शांतता आणि ती कायम ठेवण्यासाठी पोलीस आणि शासन किती तत्पर राहणार, यावर अवलंबित असणार आहे. तसे झाल्यास येणाऱ्या काही वर्षात गडचिरोली जिल्हा केवळ मागासलेपणाची मरगळ झटकून विकासाच्या मार्गावर अग्रेसर होणार नाही तर आपल्या समृद्ध खनिज संपत्तीतून राज्याच्या, देशाच्या प्रगतीत मोठा हातभार लावण्याची शक्यता आहे.


ही बातमी वाचा: