बीड : एकीकडे पेट्रोल, डिझेलच्या रोज वाढणाऱ्या दरामुळे सर्वसामान्य माणूस वैतागला आहे. तर दुसरीकडे पेरणीच्या तोंडावर खताच्या किंमतीमध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांवर अधिकचा बोजा पडणार आहे. या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकऱ्यांचं खरीपाचं बजेट कोलमडणार आहे.


यावर्षी पहिल्यांदाच शेतकऱ्यांना खते खरेदी करताना पोस्ट प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र खताचा व्यवहार पारदर्शक होण्यासाठी आग्रही असलेलं प्रशासन वाढणाऱ्या खताच्या किंमती कमी करु शकलेलं नाही.

यावर्षी मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आणखी शेतकऱ्यांचा हरभरा मात्र मार्केट कमिटीच्या मैदानात मोकळा पडलाय. ऑनलाइन खरेदीचा घोळ घालत सरकारने पुराणी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना तासनतास आणि अनेक दिवस मार्केट कमिटीच्या रांगांमध्ये बसायला लावलं. अजूनही दोन महिन्यांपूर्वी नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा हरभरा विक्री झालेला नाही.

सरकारने कर्जमाफीची घोषणा तर केली, मात्र त्यातील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. अनेकांच्या डोक्यावर अजूनही कर्जाचा बोजा आहे. या परिस्थितीमध्ये पेरणीच्या तोंडावर खताच्या किंमतीमध्ये वाढ केल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

खताच्या दरातील वाढ

खताचा प्रकार          जुना दर    आताचा दर

15 : 15 : 15           887            975

18 : 46 : 0           1076             1258

20 : 20 : 0/13       850              930

10 : 26 : 26          1055            1135

12 : 32 :16           1061            1145

24 : 24 : 0            1015            1110

किंमती वाढण्याचं कारण काय?

खताला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्या आहेत, ज्याचा परिणाम भारतातील खताच्या किंमतीवर झाला, असं बोललं जात आहे.

संबंधित बातमी :

राज्यातील 19 हजार कृषी सेवा केंद्रांवर स्वाईप मशिन