बीड : शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेल्या हजारो क्विंटल हरभऱ्याच्या बारदान्याअभावी घुगऱ्या झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव बाजार समिती आवारात 1650 शेतकऱ्यांचा हरभरा विक्रीसाठी आणला होता. शिवाय बाजार समितीने खरेदी केलेला 1300 क्विंटल अशा एकूण 19 हजार 300 क्विंटलसह 38 हजार 600 पोत्यातील हरभऱ्याचं पावसात नुकसान झालं.


बाजारात भाव नसल्यामुळे हरभरा कवडीमोल भावाने विकावा लागतो. त्यामुळे  शेतकऱ्यांनी हमीभावासाठी हरभरा शासनाच्या विक्री केंद्रावर गेल्या तीन महिन्यांपासून आणला आहे. मात्र खरेदीसाठी बारदाना नसल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून खरेदी बंद आहे. शिवाय खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी शासकीय गोदामात जागाही नाही, त्यामुळे हरभरा खरेदीचा लपंडाव सुरु आहे.

या केंद्रावर खरेदी बंद केली असली तरी 1650 शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. नोंदी केलेला हजारो क्विंटल हरभरा मापाअभावी जागेवरच पडून राहिला. शेतकरी या हरभऱ्याचं कसंबसं संरक्षण करत होते, मात्र माजलगावात काल वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठं नुकसान केलं.

या नुकसानी प्रकरणी माजलगावचे तहसीलदार एन. जी. झंपलवाड यांनी खरेदी केंद्रावर नुकसानीची पाहणी केली. पाहणीनंतर मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या मार्फत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला आहे.