Nagpur News नागपूर :  नागपुरात देशातील पहिली विजेवर चालणारी एलिवेटेड बस सेवा सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. नागपुरातील (Nagpur News) रिंग रोडवर पन्नास किलोमीटर अंतरापर्यंत ही खास बस सेवा चालवली जाईल. त्यासाठी टाटा आणि स्कोडा या नामांकित ऑटोमोबाईल कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून ही खास बस तयार केली जात असून ती बस 18 मीटर लांब राहणार आहे. या खास बसमध्ये प्रवाशांना विमानासारख्या सर्व सोयी उपलब्ध राहील, असे ही गडकरी म्हणाले.


एलिवेटेड बस सेवेचे दर 30 टक्क्यांनी कमी


विशेष म्हणजे एसटी किंवा महापालिकेकडून डिझेलवर चालवल्या जाणाऱ्या बस सेवेपेक्षा विजेवर चालणाऱ्या या बस सेवेचे दर 30 टक्क्यांनी कमी राहतील. असा दावा ही गडकरींनी केला आहे. एलिव्हेटेड मार्गावर विजेवर चालणाऱ्या बस सेवेचा हा देशातील पहिलाच प्रयोग राहील आणि त्याची अंमलबजावणी नागपुरातील अत्यंत वर्दळीच्या रिंग रोडवर 50 किलोमीटर अंतरापर्यंत केली जाईल अशी माहिती ही नितीन गडकरींनी दिली. आज नागपुरात नैसर्गिक शेती या पुस्तकाचे विमोचन गडकरी यांच्या हस्ते होत असून ऍग्रो व्हिजन शेतकरी भावनाचे भूमिपूजनही पार पडला. यावेळी या कार्यक्रमात ते बोलत होते. 


कधीकाळी माझ्या पाठीमागे माझ्या वक्तव्याची खिल्ली उडवायचे


देशाचा शेतकरी एक दिवस इंधन उत्पादन करेल, विमानांना उडवण्यासाठी लागणारे एअर फ्युल तयार करेल, असं मी गेल्या पंधरा वर्षापासून बोलत होतो. शेती क्षेत्रात माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी ही साहेब काहीही बोलतात, असे बोलायचे. माझ्या पाठीमागे माझ्या वक्तव्याची खिल्ली उडवायचे, माझ्यासमोर बोलण्याची त्यांची हिंमत नव्हती, मात्र आज मला आनंद आहे की आपल्या देशातील शेतकरी इंधन उत्पादनामध्ये बायो फ्युलच्या माध्यमातून आपला वाटा देत आहेत. 


देशात इथेनॉल वर आधारित पेट्रोल पंप सुरू होत आहे. देशातील सर्व मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना मी इथेनॉल चालणारे वाहन उत्पादन करण्यास लावले आहे. शेतकरी खाद्य पिकांच्या उत्पादन करून श्रीमंत होऊ शकत नाही. तर शेतकऱ्यांनी बायोफ्यूल तयार करणाऱ्या पिकांच्या माध्यमातून इंधन उत्पादनात वाटा द्यावा, त्याच्यातून ते श्रीमंत होऊ शकतात. असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)  यांनी बोलताना व्यक्त केलाय.


बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये दहा हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आजवर आत्महत्या केली आहे. आमचे प्रयत्न आहे की हे आत्महत्या थांबल्या पाहिजे. या भागात कापूस, सोयाबीन आणि संत्रा प्रमुख शेती उत्पादन आहे. या पिकांचे मूल्यवर्धन कसं होईल, याचे प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही परिस्थिती एका एकरात 15 क्विंटल कापूस आणि 15 क्विंटल  सोयाबीनचे उत्पादन झालेच पाहिजे. असेही नितीन गडकरी म्हणाले. 


हे ही वाचा