छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे, अन्यथा सरकारला पुढील आंदोलन जड जाईल असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. त्यामुळे, 24 डिसेंबरनंतरचे आंदोलन कसे असणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहे. असे असतानाच सोशल मीडियावर (Social Media) 24 डिसेंबरनंतर मुंबईत जरांगेंचा ट्रॅक्टर मोर्चा (Tractor March) धडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे, गावागावात मराठा आंदोलकांकडून ट्रॅक्टर्स व कार्यकर्ते घेऊन मुंबईत जाण्याची तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियातून ट्रॅक्टर मोर्च्याच्या निमित्ताने जोरदार वातावरणनिर्मिती करण्यात येत असल्याचे देखील दिसत आहे. ज्यात सोलापूर (Solapur), इंदापूर (Indapur), पुणे (Pune), पनवेल (Panvel), कल्याण (Kalyan), ठाणेमार्गे (Thane) मुंबईतील (Mumbai) मंत्रालयावर हा मोर्चा धडकणार असल्याचे सांगितले जात आहे. 


मनोज जरांगे पाटील यांना सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेली मुदत संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालवधी शिल्लक राहिला आहे. त्यातच सोशल मीडियावर मुंबई आंदोलनाची तयारी सुरू झाली असल्याच्या पोस्ट पाहायला मिळत आहे. ज्यात, 24 तारखेनंतर आरक्षण न मिळाल्यास मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करणार असल्याचा दावा केला जात आहे. या आंदोलनात गावागावातून ट्रॅक्टर भरून लोकं मुंबईला जाणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे, जरांगे पाटील आणि मराठा समाज 24 तारखेनंतर मुंबई जाम करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. 


सोशल मिडीयावरील आंदोलनाची तयारी...



  • 25 डिसेंबर रोजी जरांगे यांच्या नेतृत्वात राज्यभरातून शेकडो ट्रॅक्टरचा मोर्चा घेऊन मुंबईत धडकण्याची तयारी आंदोलकांनी सुरू केले आहे. 

  • सोशल मीडियातून त्यासाठी जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. 

  • सोलापूर, इंदापूर, पुणे, पनवेल, कल्याण, ठाणेमार्गे मुंबई मंत्रालय असा मोर्चाचे मार्ग असेल असंही सांगण्यात येत आहे.

  • पंजाब, हरियाणा शेतकरी आंदोलनाप्रमाणे सकल मराठा समाजाने ट्रॅक्टर मोर्चात सहभागी व्हावे.

  • एक ट्रॅक्टर आणि ट्रॅलीसोबत दहा समाजबांधवाने उपस्थित राहावे. 

  • दहा दिवस पुरेल इतक अन्नशिधा सोबत ठेवावा. 

  • अंगातील कपडे, अंथरुण-पांघरुण, अन्न शिजवण्यासाठी गॅस, स्टोव्ह, चूल, लाकूड आदी साहित्य सोबत ठेवावे. 

  • यासाठी 20 डिसेंबरपर्यंत मोबाइलवर नाव नोंदणी करावी.

  • मराठा आरक्षणासाठी मुंबई जाम करण्याची तयारी असल्याचा देखील दावा केला जात आहे. 


मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया...


दरम्यान, सोशल मीडियात सुरु असलेल्या ट्रॅक्टर मोर्च्याच्या चर्चेबाबत मनोज जरांगे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. " 24 डिसेंबरनंतरचे आंदोलन कसे असणार याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. त्यासाठी 17 डिसेंबरला बैठक बोलवण्यात आली आहे. याच बैठकीत पुढील आंदोलना बाबत सविस्तर चर्चा होईल. आम्ही 24 डिसेंबरनंतर ही बैठक घेणार होतो. मात्र, काही घटनांनी सरकारवरचे विश्वास उडाले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव 17  डिसेंबरला बैठक घ्यावी लागत आहे. आमची फसवणूक झाली आहे. गुन्हे मागे घेतले नाहीत, लेखी देखील दिले नाही. त्याच्या (छगन भुजबळ) सांगण्यावरून सरकार काम करतो. पण, पूर्वीचा मराठा आता राहिला नाही. शांततेत आता आंदोलन करेल, कुठल्याही नेत्याला  न जुमानता रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे जरांगे म्हणाले आहेत. 


17 डिसेंबरची बैठक महत्वाची 


मनोज जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षणावर ठाम आहेत. तर, सरकार स्वतंत्र आरक्षणासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत आह. त्यामुळे दोघांच्या भूमिकेतील अंतर अजून तरी कमी झालेले नाही. त्यामुळे खरोखरच 24 तारखेपर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल का? यावर प्रश्नचिन्ह आहे. सोबतच 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार आणि खरचं मुंबईत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा होणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


मनोज जरांगे यांच्या भूमीकडे लक्ष...


ट्रॅक्टर मोर्चाची सोशल मीडियातून राज्यभर वातावरणनिर्मिती केली जात आहे. एकाच वेळी शेकडो ट्रॅक्टर मुंबईच्या दिशेने गेल्यास मुंबईतील रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गही जाम होतील. मात्र हा निर्णय घ्यायचा का नाही याचे सर्वाधिकार मनोज जरांगे पाटील यांना आहेत. तर,आपली भूमिका 17 डिसेंबरनंतरच आपण स्पष्ट करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे 17 डिसेंबर रोजी होणार बैठक महत्वाची समजली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


भुजबळ विश्वासघातकी, त्यांना कोण कशाला गोळी घालेल? मनोज जरांगेंचा सवाल