Chhatrapati Sambhaji Nagar News: उन्हाचा चटका वाढत असून, पाण्याची मागणी देखील वाढत आहे. मात्र असे असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) मध्यवर्ती भाग असलेल्या औरंगपुऱ्यात चक्क दूषित पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. आधीच विस्कळीत पाणीपुरवठा होत असताना आता त्यातल्या त्यात पाणी देखील दुषित येत असल्याने नागरिकांना पिण्याचचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. 


छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम आहे. तर गेल्या काही महिन्यापासून मुख्य जलवाहिनीवर सतत होणाऱ्या बिघाडामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. आधीच उन्हाळा सुरु असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. अशात आता विस्कळीत पाणीपुरवठ्यासोबतच दुषित पाण्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. दरम्यान, शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या औरंगपुरा भागात अक्षरशः काळ्या रंगाचे पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना विकतचे पाणी वापरण्याची वेळ आहे. विशेष म्हणजे उन्हाळा सुरु असल्याने पाण्याचे टँकरचे दर देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. 


ड्रेनेजयुक्त दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्य धोक्यात...


विस्कळीत पुरवठ्यामुळे पाणीटंचाईच्या झळा असह्य होत असताना त्यातच दूषित पाणीपुरवठ्यामुळे औरंगपुरावासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंबंधी येथील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही मनपा प्रशासन गांभीर्य घेत नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. जायकवाडी धरणात मुबलक पाणी असूनही मनपा प्रशासन शहरातील नागरिकांची तहान भागविण्यास असमर्थ ठरत आहेत. तसेच दर सहाव्या दिवशी पाऊण तास पाणीपुरवठा अशी परिस्थिती आहे. त्यातच ड्रेनेजयुक्त दूषित पाणीपुरवठ्यामुळे अनेक भागांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


अन्यथा मोर्चा काढणार... 


मागील तीन आठवड्यांपासून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या औरंगपुरा परिसरात पाणी दूषित येत आहे. तेथील अनेकदा तक्रार करून देखील या प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यावर लवकरात लवकर पर्याय न काढल्यास मनपा कार्यालयात मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा एका मनपा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे. 


सतत पाणीपुरवठा विस्कळीत...


छत्रपती संभाजीनगर शहराला 700 आणि 1400 मिमी जलवाहिनीमधून पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. मात्र या दोन्ही योजना जुन्या झाल्याने सतत जलवाहिन्या फुटत आहे. तर अनकेदा जलशुद्धीकरण केंद्रात आणि पाणी उपसा केंद्रात तांत्रिक बिघाड होत आहे. त्यामुळे महिन्यातून तीन-चार वेळा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. दरम्यान याचे परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत असून, नागरिकांना उशिरा पाणी मिळत आहे. तर पाण्याच्या टप्प्यात देखील वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


पाणी टंचाई! राज्यातील 274 गावं-वाड्यांवर 75 टँकरद्वारे पाणीपुरवठा; पाहा कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?