बुलढाणा: पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय गणिते लक्षात घेऊन या विधानपरिषद निवडणुकीतील (Vidhan Parishad Election 2024) उमेदवार ठरतील. त्यामुळे विधानपरिषदेच्या उमेदवारांची निवड अत्यंत कळीचा मुद्दा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम (Muslim) समाजाने केलेले मतदान निर्णायक ठरले होते. मुस्लीम व्होटबँक एकगठ्ठा महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहिल्याने महायुतीला फटका बसला होता. हीच गोष्ट लक्षात घेऊन अजितदादा गटाकडून (Ajit Pawar Camp) आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्यात आला आहे.


आगामी विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्याने अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Camp) विदर्भातून एक मुस्लिम उमेदवार दिल्या जाण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने सर्वात मजबूत दावेदार म्हणून ओळखले जाणारे गेल्या दहा वर्षांपासून बुलढाणा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी (Nazer Kazi) हे उमेदवार म्हणून जाहीर होण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली आहे. या अनुषंगाने येत्या सोमवारी नाझेर काझी यांना अजित पवारांनी भेटायला बोलावले असल्याचे खुद्द काझी यांनी "एबीपी माझा" ला सांगितले.


नाझेर काझी हे अजित पवार यांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. गेल्या दहा वर्षांपासून ते बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काझी ज्या मतदारसंघात राहतात, त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असून डॉ.राजेंद्र शिंगणे हे आमदार आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अजित पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याचदिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने विधानपरिषद निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडीच्या मतांची फाटाफूट होणार का, हे बघावे लागेल.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची बैठक


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या नेतृ्त्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची बैठक पार पडली होती.  या बैठकीत अल्पसंख्याक समाजाचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा झाली होती. तेव्हा अल्पसंख्याक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना काही गोष्टी सुचवल्या होत्या. महायुतीच्या नेत्यांकडून मुस्लीम समाजासंदर्भात सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्यं केली जात असल्याबद्दल अल्पसंख्याक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव अजित पवारांनी महायुती सरकारसमोर मांडावा, असेही राष्ट्रवादी काँग्रेसमधील अल्पसंख्याक नेत्यांनी सुचवले होते. 


आणखी वाचा


विधान परिषदेच्या 12 जुलै रोजी पार पडणाऱ्या निवडणुकीला स्थगिती द्या; ठाकरे गटाची मागणी, सर्वोच्च न्यायालयात धाव