Buldana Latest Marathi News upadate:  बुलढाणा जिल्ह्यातील खरपानपट्टा म्हणून ओळख असलेल्या संग्रामपूर, जळगाव -जामोद व शेगाव तालुक्यात भूगर्भात क्षारयुक्त पाणी आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य आहे.   त्यामुळेच या परिसरात हजारो नागरिकांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे शासनाने जवळच असलेल्या हनुमान सागर धरणातून या परिसरातील 144 गावाना पाईपलाईनद्वारे पिण्याचं पाणी पुरवठा योजना आखळी. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला. प्रत्येक गावात लाखो रुपये खर्चून आर.ओ. फिल्टर देखील उभारले. मात्र हे महागडे फिल्टर अध्याप सुरूच झाले नाहीत. त्यामुळे अनेक गावात हे फिल्टर गेल्या सात वर्षांपासून धूळखात पडून आहेत. गावातील नागरिकांना याचा कुठलाही फायदा होत नाहीये. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर , जळगाव - जामोद व शेगाव या तालुक्यांना निसर्गाने खरपान पट्टा अशी ओळख देऊन एक शाप दिला आहे. या परिसरातील भूगर्भातील पाणी हे क्षारयुक्त असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. आणि त्यामुळे आतापर्यंत या तालुक्यातील हजारो नागरिकांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला हे वास्तव आहे. मात्र या परिसरात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी व किडनीच्या आजारावर नियंत्रण मिळवाव म्हणून सरकारने सात वर्षांपूर्वी या परिसरातील अनेक गावात लाखो रुपये खर्चून आर.ओ. फिल्टर प्लान्ट उभारलेत. जवळपास एका प्लांटवर 16 लाख खर्च करून 56 गावात हे प्लांट उभारलेत. मात्र काही दोन ते तीन गावे सोडलीत तर अनेक गावात हे प्लान्ट उभारणीपासून सुरूच झाले नसल्याच धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. 


आता आपण बघत असलेला हा फिल्टर प्लांट आहे, संग्रामपूर तालुक्यातील बोडखा या गावाची साधारण 1500 लोकसंख्या आहे. या गावात आतापर्यंत शेकडो नागरिकांचा क्षारयुक्त पाणी पिल्याने व किडनीच्या आजाराने मृत्यू झालाय. म्हणून सरकारने सात वर्षांपूर्वी या गावात एक नाही तर दोन फिल्टर प्लांट उभारलेत. हे फिल्टर प्लांट फक्त सुरवातीला काहीच दिवस चालले.  सरकारने किडनीच्या रुग्णांना या परिसरात अनेक सुविधा दिल्या, मात्र या सर्व कागदावरच आहेत. आणि त्यामुळे या परिसरातील किडनीचा आजार नियंत्रणात येत नाही. रोजच किडनीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रत्येक 100 लोकांमध्ये सात ते आठ जणांना किडनीचा आजार असल्याचं वैद्यकीय तज्ञ सांगतात. बुलढाणा जिल्ह्यातील या खारपान पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यात शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केलेत. मात्र सात वर्षांपासून हे फिल्टर सुरू न झाल्याने या भागातील किडनीच्या आजाराने नागरिकांचा मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं वास्तव आहे. या परिसरातीळ नागरिकांना निसर्गाने दिलेला शाप आतातरी शासन गांभिर्याने घेणार का हे बघावं लागेल!