Ravikant Tupkar :  प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) काम बघणाऱ्या AIC या कंपनीनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 16 जिल्ह्यात काम ही कंपनी काम करते. या 16 जिल्ह्यातील कार्यालये आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय AIC या कंपनीनं घेतला आहे. या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sangathan) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीला शेतकऱ्यांचे पैसे देणे जीवावर आले असल्यानंच कंपनी पळ काढत असल्याचा आरोप तुपकरांनी केलाय. कंपनीनं शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे तुपकर म्हणाले. याबाबत राज्य सरकारनं तत्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न मिटवावा, अन्यथा शेतकरी आणि कंपनीमध्ये संघर्ष पेटेल असा इशारा तुपकरांनी दिला आहे. 


नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आता तक्रार कुठे करायची? 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 16 जिल्ह्यातील कार्यालये आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय AIC या कंपनीनं घेतला आहे. त्यामुळं आताच्या खरीप हंगामात कोट्यवधी रुपये प्रीमियम भरूनही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रार कुठे करायची? कोणाला फोन करुन माहिती घ्यायची हा मोठा प्रश्न राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. या प्रकारावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच संतापले असून त्यांनी विमा कंपनीवर शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.


विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचीच नाही तर सरकारचीही फसवणूक


जर घोटाळा केला नाही असे विमा कंपनीचे म्हणणे असेल, तर त्यांनी केलेले पंचनाम्याचे फॉर्म आणि कृषी कंपन्यांनी केलेले पंचनामे पडताळावे. 'दूध का दूध, पाणी का पाणी' होऊन जाऊद्या असे रविकांत तुपकर यावेळी म्हणाले. विमा कंपनीनं शेतकऱ्यांचीच नाही तर सरकारचीही फसवणूक केल्याचा आरोप तुपकरांनी केला आहे. त्यामुळं राज्य सरकारनं तत्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न मिटवावा, अन्यथा शेतकरी आणि कंपनीमध्ये संघर्ष पेटेल आणि जर शेतकरी व कंपनीमध्ये संघर्ष निर्माण झाला तर त्याला कंपनी जबाबदार राहील, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. त्यामुळं आता तुपकरांच्या इशाऱ्यानंतर सरकार आता काय भूमिका घेणार का? पीक विम्याबाबतचा प्रश्न निटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


या 16 जिल्ह्यात AIC कंपनीनं कार्यालये बंद करण्याचा घेतला निर्णय


राज्यातील 16 जिल्ह्यात AIC कंपनी विमा योजनेचं काम करते. या 16 जिल्ह्यातील कार्यालये आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय AIC या कंपनीनं घेतला आहे. या 16 जिल्ह्यांमध्ये बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवमाळ, सोलापूर, जळगाव, सातारा, नंदुरबार, औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्याचा समावेश आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Crop Insurance : पीक विमा योजनेचं काम बघणाऱ्या AIC कंपनीचा मोठा निर्णय, 16 जिल्ह्यातील कार्यालये बंद करणार, सुत्रांची माहिती