बुलढाणा: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आहे. कापूस आणि सोयाबीनच्या दराबाबत रविकांत तुपकर यांनी 29 तारखेला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी सीआरपीसी 149 अंतर्गत नोटीस बजावली होती. मात्र रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेत 29 नोव्हेंबर रोजी मंत्रालय ताब्यात घेणारच अशी भूमिका पोलिसांना कळविल्याने रविकांत तुपकर यांना आज अटक करण्यात आली.


रविकांत तुपकर यांच्या अटकेने बुलढाण्यात कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात व शेजारील जिल्ह्यात रविकांत तुपकर यांच्या अटकेचे पडसाद उमटण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.


मंत्रायल ताब्यात घेण्याचा दिला होता इशारा


राज्यात आणि विशेषत: विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पांढरे सोने म्हणून बघितल्या जाणाऱ्या कापूस आणि सोयाबीन पिकाला योग्य हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. कापूस उत्पादक शेतकरी आणि शेतमजूर यांच्या विविध मागणीसाठी गेल्या 20 नोव्हेंबरला बुलढण्यात (Buldhana) तुपकरांनी भव्य शेतकरी एल्गार मोर्च्याचे आयोजन केले होते. या मोर्च्यात हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने तुपकरांनी कापूस आणि सोयाबीनच्या पिकाला योग्य हमी भाव द्यावा या  मागणीसाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. आता याच प्रश्नावर रविकांत तुपकरांनी थेट मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे.


सरकारने 28 तारखेपर्यंत कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर तत्काळ तोडगा काढला नाही तर 29 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट मंत्रालयाचा ताबा घेऊ. असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे.या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे.मात्र असे असले तरी रविकांत तुपकर यांनी नोटीसीला  प्रतिसाद न देता मंत्रालय ताब्यात घेण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे बोलले आहेत.या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त वाढवला असून रविकांत तुपकर यांच्या घराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.या पोलीस बंदोबस्तात एक पोलीस निरीक्षक,एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दहा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.


"सरकार हमसे डरती हैं,पुलिस को आगे करती हैं ”


 सरकारने कापसाला व सोयाबीनला योग्य हमी भाव द्यावा या मागणीसाठी मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी नोटीस दिली आहे.अशा नोटीसांची मला सवय आहे,अशा नोटीसांना आम्ही भीक घालत नाही, शेतकऱ्यांचा हक्क मागणे हा जर गुन्हा होत असेल तर तो आम्ही  कायम करणार.पोलीसांनी सरकारच्या इशाऱ्यावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये,आंदोलनात आम्ही  शहिद होण्याची तयारी आहे. मंत्रालय कोणाच्या बापाचे नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहे.त्यामुळे मंत्रालयात जाण्यापासून शेतकऱ्यांना कोणीही रोखू शकत नाही. सरकारने तातडीने सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे बाजूने निर्णय घ्यावे,अन्यथा 29  नोव्हेंबरला हजारो शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेतील."सरकार हमसे डरती हैं,पुलिस को आगे करती हैं ”अश्या आशयाची पोस्ट फेसबुकवर करत रविकांत तुपकरांनी सरकारला इशारा दिला आहे.


अशी आहे मागणी 


सोयाबीन,कापूस,इतर पिकांच्या नुकसानीपोटी एकरी दहा हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी.सोयाबीनला प्रती क्विंटल नऊ हजार,कापसाला प्रती क्विंटल किमान 12 हजार 500 रुपये भाव द्यावा.तसेच पीक विम्याची अग्रिम आणि शंभर टक्के पीक विमा भरपाई  मिळावी यासह अनेक मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.सरकारने कापसाला व सोयाबीनला एक आठावड्यात योग्य हमी भाव दिला पाहिजे, अन्यथा 29 नोव्हेंबरला लाखो शेतक-यांसमवेत मंत्रालयाचा ताबा घेऊ.असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. त्यामुळे तुपकर यांच्या या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन कामाला लागले आहे.या प्रकरणी पोलीस अधिकारी तुपकर यांच्या घरी पोहोचले असून पोलिसांनी त्यांना अटक करून  न्यायालयात हजर केले आहे. 


ही बातमी वाचा: