Maharashtra Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण येत्या 15 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याच्या चर्चा सुरु असताना, आज (10 ऑगस्ट) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा देखील मुहूर्त लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत. राज्यातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि समृद्धी महामार्गाचं काही पॅकेजेसमध्ये अजूनही अपूर्ण असल्याच्या बाबींचा हवाला देत ही माहिती समोर आली आहे. मात्र सरकार आणि MSRDC कडून या महामार्गाच्या अधिकाऱ्यांना तयार राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून, कधीही तारीख जाहीर होऊ शकते असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता हा देण्यात आलेला तिसराही मुहूर्त पुढे ढकलला जाऊ शकतो अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकार आल्या आल्या 15 ऑगस्ट ही तारीख जवळपास निश्चित झाली होती. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याबाबतीत आता सरकार नवीन तारीख जाहीर करते किंवा घाईघाईत लवकरच लोकार्पण करत हे पाहणे महत्त्वाचे आहे.


मुख्यमंंत्र्यांकडून 15 ऑगस्टच्या तारखेची घोषणा


समृद्धी महामार्ग वाहनांसाठी लवकरच खुला होणार असल्याचं मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 जुलै रोजी मुंबईतील एका सत्कार कार्यक्रमात म्हटलं होतं. 15 ऑगस्ट रोजी नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग चालू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. "समृद्धी महामार्ग गेम चेंजर आहे. या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिलं आहे. ही फडणवीसांची योजना होती. त्यांनी मला जबाबदारी दिली, मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. या महामार्गामुळं लोकांची समृद्धी होईल, शेतकरी आत्महत्या करणार नाही," असंही शिंदे यांनी म्हटलं होतं. 


लोकार्पणासाठी तारीख पे तारीख


दरम्यान नागपूर-मुंबई दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशाने 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत केली. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्यात आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जातं आहे. सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरु करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या सरकारकडून ऑक्टोबर 2021, 31 डिसेंबर 2021 आणि आता 31 मार्च 2022 ही तारीख देण्यात आली होती. पण अजूनही समृद्धी महामार्गाचं काम अपूर्ण असल्याची माहिती आहे.  


समृद्धी महामार्गाविषयी सर्वकाही


- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग


- मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतूक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प असल्याचं सांगितलं जातं.


- सध्या मुंबई ते नागपूर अंतर कापण्यास सुमारे 14 तास लागतात. जवळपास 812 किमी अंतर पडते. जर समृद्धी महामार्ग झाल्यास अंतर 700 किमी होईल आणि फक्त 8 तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) काम पाहणार आहे.


- समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई!


- जवळपास 26 तालुके आणि 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.


- समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH3, NH6, NH7, NH69, NH204, NH211, NH50 यांचा समावेश होतो.


- महामार्गाची एकूण रुंदी 120 मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अशा आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका ही 22.5 मीटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहे.


- प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा 150 किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करायची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही हे विशेष.


- महामार्गात हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने इत्यादी उभारण्यात येणार आहे.


- जवळपास 50 पेक्षा जास्त उड्डाणपुल, 24 हून आधिक इंटरचेंजेस वे तसेच 5 बोगदे प्रस्तावित आहेत.


- हा महामार्ग खाजगी भागीदारीतून होणार असल्यामुळे टोलही पडणार आहे. टोल हा प्रवास केलेल्या अंतरावरच पडणार आणि तो स्वयंचलित असणार आहे


- युद्धजन्य परिस्थितीत अथवा नैसर्गिक आपत्ती दरम्यान महामार्गावर विमान उतरु शकेल असा रन वे असणार आहे.


- समृद्धी महामार्ग हा रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे काम करणार आहे. तब्बल 25 लाख रोजगाराची संधी उपलब्ध होईल असा दावा आहे.


- या प्रकल्पासाठी तब्बल 50 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी पन्नास हजार एकर जमीन लागणार आहे.