Buldhana Crime News:  बुलढाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटात एका 34 वर्षीय महिलेवर आठ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार काल घडला होता. त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी अज्ञात आठ आरोपींविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा महिलेसोबत असलेल्या नातेवाईक पुरुषाच्या तक्रारीवरून दाखल केला होता. स्वतः या भागाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोरखेडी पोलीस ठाण्यात तीन तास ठिय्या मांडून पुन्हा दाखल करून घेतला होता. पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. हे वृत्त पसरतात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. मात्र या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. तशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


या प्रकरणात पीडित महिलेऐवजी तिच्यासोबत असलेल्या नातेवाईक पुरुषाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता माझ्यावर कोणतही लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे त्या महिलेने म्हटले आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे आता या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. 


महिलेने पोलिसांना जबाबात काय सांगितले?


पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, "काल दुपारी दोन वाजता आम्ही देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो.. रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून टेकडीवर आम्ही बसलो.. त्यावेळी तिथे आठ जण आले... त्यांनी आम्हाला घेरलं... सोबतच्या पुरुषाला ही मारहाण केली. त्या आठ जणांचे चेहरे रुमालाने बांधलेले होते. आरोपींनी आमच्याकडील पैसे मोबाईल, आमचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची आणि समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेले असल्याचे या 34 वर्षीय  महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. लैंगिक अत्याचार झालेलाच नाही. त्यामुळे माझ्या वैद्यकीय तपासणीची ही गरज नाही. असे या महिलेने पोलिसांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना लिहून दिलं आहे. 


आमदार संजय गायकवाड यांचा गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या


दरम्यान, सामूहिक अत्याचाराच्या घटनेची माहिती समोर आल्यानंतर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तात्काळ बलात्काराचे गुन्हे दाखल करावे, आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी त्यांनी बोराखेडी पोलीस स्थानकात रात्री ठिय्या मांडला होता. यावेळी पोलिसांना संजय गायकवाड यांनी चांगलच धारेवर धरलं होतं.


सत्य समोर कसे येणार?


राजूर घाटात झालेल्या या अत्याचार प्रकरणाला वेगळं लागलं आहे. फिर्यादी म्हणतो तिच्यावर बलात्कार झाला.  मात्र महिला सांगते माझ्यावर कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झाला नाही. असे दोन वेगवेगळे जबाब समोर आल्यानंतर संभ्रम निर्माण झालेला आहे .मात्र पोलिसांनी अजूनही तपास थांबवलेला नाही. पोलिसांचा हा तपास सुरू आहे. त्यामुळे सत्य समोर कसे येणार? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्या पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी होणार का? जर बलात्कार झालाच नाही तर सोबतच्या पुरुषाने बलात्काराची तक्रार का दिली? आमदारांनी त्या ठिकाणी गोंधळ घालून पोलिसांवर दबाव आणून पुन्हा दाखल करायला का लावला? का त्या महिलेवर किंवा पुरुषावर राजकीय फायद्यासाठी काही लोकांनी दबाव आणला होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता सामान्य जनता मागत आहे.