Bhendwal Bhavishyavani 2023 : शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट, घटात पाणी आणि त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध 18 प्रकारची  धान्य, अशा या 'घट मांडणी'तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जातो. बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी दावा करतात की, 350 वर्षांपासून अक्षयतृतीयेला ही प्रथा जोपासली जाते. या प्रथेला शेतकऱ्यांची मोठी मान्यता असते आणि या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.  राज्यातील शेतकऱ्यांचा या प्रथेवर मोठा विश्वास असतो, अशी ही घटमांडणी येत्या शनिवारी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी भेंडवळ गावात होणार आहे. 


350 वर्षांपूर्वी या भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली ही प्रथा आजही सुरू आहे. आजच्या काळात तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचं निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात. गेल्या तीन वर्षांत  देशावर कोरोना सारख्या भयंकर संकटानं आक्रमण केलं होतं. त्यामुळे याठिकाणी राज्यभरातून शेतकरी येऊ शकले नाहीत. यंदा मात्र येणाऱ्या वर्षभरात नेमकी पावसाची, पिकांची, देशातील राजकीय स्थिती काय असणार आहे? हे या अंदाजानुसार जाणून घेण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हे अंदाज किती खरे ठरतात? यावर शंका असली आणि या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला, तरीही शेतकरी वर्ग मात्र यावर मोठा विश्वास ठेऊन आपल्या वर्षभराचं शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसार करतात.


काय आहे भेंडवळ भविष्यवाणी?


पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्यात येते. गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती. आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत. 


भेंडवळमध्ये भविष्यवाणी कशी केली जाते?


भेंडवळची घट मांडणी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सायंकाळी करण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतात घटाची आखणी करुन, त्यात घागर, मातीचे ढेकळे, पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ बाजरी, तांदूळ, अंबाडी, वाटाणा, सरकी, मसूर, करडी असे एकूण 18 प्रकारच्या धान्याची प्रतिकात्मक मांडणी केली जाते. पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं.



(टीप : 'भेंडवळची घट मांडणी' ही बुलढाण्यातील भेंडवळ गावातील स्थानिक परंपरा आहे. त्यातून ते पावसाचा अंदाज वर्तवतात असा त्यांचा दावा आहे. स्थानिकांचा त्यावर विश्वास आहे. एबीपी माझा केवळ या घटनेचं वार्तांकन करतंय. घटमांडणीच्या परंपरेचं समर्थन करत नाही.)