Ravikant Tupkar : सोयाबीन (Soybean) आणि कापूस (Cotton) उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुपकरांनी चिखली तालुक्यातील जालना-खामगाव महामार्गावर असलेल्या सोमठाणा (Somthana) या गावात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. कापूस आणि सोयाबीनला सरकारनं लवकरात लवकर उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा या मागणीसाठी रविकांत तुपकर शेकडो शेतकऱ्यांसह आज रात्रीपासूनच अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.


29 तारखेला मंत्रालय ताब्यात घेणारच


यापुढे कापूस आणि सोयाबीन प्रश्नावर चिखली तालुक्यातील सोमठाणा हे गाव केंद्रबिंदू असेल अशी घोषणा रविकांत तुपकर यांनी केली. दरम्यान, सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर तोडगा नाही निघाला तर  29 तारखेला मंत्रालय ताब्यात घेणारच असा इशारा देत तुपकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.


रविकांत तुपकरांना अटक, त्यानंतर सुटका


कापूस आणि सोयाबीनच्या दराबाबत रविकांत तुपकर यांनी 29 तारखेला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी सीआरपीसी 149 अंतर्गत नोटीस बजावली होती. मात्र रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेत 29 नोव्हेंबर रोजी मंत्रालय ताब्यात घेणारच अशी भूमिका पोलिसांना कळविल्याने रविकांत तुपकर यांना आज अटक करण्यात आली होती. त्यानंतर रविकांत तुपकर याना बिनशर्थ जामीन मंजूर झाला आहे. रविकांत तुपकर यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी रविकांत तुपकर यांची बाजू मांडली आहे.


28 नोव्हेंबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम


दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर रविकांत तुपकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. बेकायदेशीरपणे पोलिसांनी अटक केल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि शेतमजूर यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या 20 नोव्हेंबरला बुलढण्यात (Buldhana) तुपकरांनी भव्य शेतकरी एल्गार मोर्च्याचे आयोजन केले होते. या मोर्च्यात हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने तुपकरांनी कापूस आणि सोयाबीनच्या पिकाला योग्य हमी भाव द्यावा या  मागणीसाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. आता याच प्रश्नावर रविकांत तुपकरांनी थेट मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे. सरकारने 28 तारखेपर्यंत कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर तत्काळ तोडगा काढला नाही तर 29 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट मंत्रालयाचा ताबा घेऊ. असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे.या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Ravikant Tupkar : मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिल्यानंतर रविकांत तुपकरांना अटक, न्यायालयात केलं हजर