बेळगाव : तेजस्वी नाईक, व्यवसायाने टेक्स्टाईल इंजिनिअर पण आता बेळगाव जवळच्या मोदगे गावी ते शेती करतात. त्यांनी मोठमोठ्या कंपन्यात नोकरी केली. त्यांच्या वडिलांची सिल्क फॅक्टरीही होती. ते सोडून शेती हा व्यवसाय का निवडला यामागे काही कारणं होती.


"वडिलांची कंपनी अडचणीत आली. त्यामुळे जागा विकावी लागली. त्यानंतर दुसरी जागा विकत घेतली, फॅक्टरी सुरु केली. पडिक जमिनीवर शेती करण्याचा निर्णय घेतला," असं तेजस्वी नाईक सांगतात.

फॅक्टरी सोडून उरलेल्या जागेत तेजस्वी नाईक यांनी तुती लागवड सुरु केली. 1995 ते 2005 या काळात आपल्याकडील साडे आठ एकरात ऊस, रेशीम शेती आणि भाजीपाला शेती ते करत होते. आता जरी ते सर्व शेती सेंद्रीय पद्धतीने करत असले तरी सुरुवातीला रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर करायचे. त्याच काळात घडलेला एक प्रसंग तेजस्वी यांच्या शेती व्यवसायातील टर्निंग पॉईंट ठरला आणि  ते सेंद्रीय शेतीकडे वळले .

तेजस्वी नाईक म्हणाले की, "रेनवॉटर हार्वेस्टिंगमुळे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झालं. फ्लॉवरच्या आंतरपिकातून 50 ते 60 हजारांचा फायदा मिळाला. त्याची पानं तयार झाल्यावर ती कापून रेशीम किड्याला दिली. पण ते किडे मेले. कीटकनाशकांचा परिणाम असल्याचं जाणवलं. रेशीमचं एक वर्ष नुकसान झालं. तेव्हाच सेंद्रीय शेती करण्याचं ठरवलं."

आज तेजस्वी नाईक साडे आठ एकरापैकी दीड एकरात भाजीपाला पिकवतात. बिनीस, नवलकोल, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, गवार, लाल मुळा, दोडकी, दुधी भोपळा, पालक, रताळी, मेथी, लाल भाजी, मिरची अशी भाजीपाला पिकं त्यांच्या शेतात आहे. भाजीपाल्यासाठी फक्त शेणखत, पालापाचोळ्याचे खत आणि चांगल्या वाढीसाठी जीवामृताची फवारणी केली जाते. दहा किलो गाईचे शेण, दहा लिटर गोमूत्र, दोन किलो गूळ, दोन किलो द्विदल धान्याचे पीठ आणि दोन किलो माती यांचे मिश्रण करुन सहा दिवस तसेच ठेवले जाते. सहा दिवसांनी तयार झालेले जीवामृत दोनशे लिटर पाण्यात घालून वापरता येते. जीवामृताची फवारणी केल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होत नाही आणि पिकाची वाढ चांगली होते असे तेजस्वी नाईक सांगतात.

सेंद्रीय पद्धतीने शेती केल्यामुळे खत आणि कीटकनाशकांचा खर्च वाचतो. सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या भाजीची चव उत्कृष्ट असल्यामुळे भाजीपाल्याची मागणीही वाढली आहे, असं तेजस्वी नाईक सांगतात. या सेंद्रीय भाजीपाल्याला इतर पिकांच्या तुलनेत चांगला भाव मिळतो.

या दीड एकरातून महिन्याला सगळा खर्च वजा जाऊन पंचवीस हजारहून अधिक नफा मिळतो, असा त्यांचा अनुभव आहे. साडे आठ एकर शेतीतून किमान दहा ते बारा लाख रुपये नफा मिळत असला तरी विषमुक्त अन्नधान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवतो याचं समाधान जास्त महत्त्वाचं असल्याचं तेजस्वी नाईक सांगतात.

पाहा व्हिडीओ