Suresh Dhas & Sandeep Kshirsagar : सुरेश धस, संदीप क्षीरसागरांकडून शिक्षक बदली प्रक्रियेत 39 कोटींचा घोटाळा; ओबीसी नेत्याचा गंभीर आरोप; म्हणाले, बिंदू नामावलीच्या माध्यमातून...
Suresh Dhas & Sandeep Kshirsagar : बीड जिल्ह्यात 2014 साली शिक्षक आंतरजिल्हा बदलीमध्ये सुरेश धस, सय्यद अब्दुल्ला, संदीप क्षीरसागर यांनी 39 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बाळासाहेब सानप यांनी केला.
Suresh Dhas & Sandeep Kshirsagar : बीड जिल्ह्यात 2014 साली जिल्हा परिषद शिक्षक आंतर जिल्हा बदली मध्ये तत्कालीन मंत्री सुरेश धस (Suresh Dhas), जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, जिल्हा परिषद शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी तब्बल 39 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी केला. बीडमध्ये (Beed News) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बीड मधील बिंदू नामावलीच्या घोटाळ्यासंदर्भात सुरेश धस यांनी तक्रार केल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बाळासाहेब सानप म्हणाले की, 14 वर्षानंतर बीड जिल्हा परिषदेत बिंदू नामावली प्रश्न उद्भवला आहे. ज्यावेळी आंतरजिल्हा बदल्या सुरू होत्या, त्या काळात 2014 साली सर्व शिक्षकांनी मागणी केली होती की, बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला परत यायचे आहे. त्यावेळी राज्याचे मंत्री सुरेश धस होते. जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला आणि संदीप क्षीरसागर हे त्यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते. त्या काळात ही सगळे भरती झाली आहे. त्या काळात प्रत्येक जणांकडून तीन लाख रुपये घेण्यात आले. तेराशे लोकांचे तीन लाख रुपये म्हणजेच एकूण जवळपास 39 कोटी रुपयांचा घोटाळा 2014 झाला असा आरोप त्यांनी केलाय.
ट्रेंडिंग
बिंदू नामावलीच्या माध्यमातून एका समाजाला टार्गेट करण्याचे काम
2014 ते 24 पर्यंत बिंदू नामावलीचा प्रश्न कुठेच निघाला नाही. मात्र आता आमदार सुरेश धस हा प्रश्न उपस्थित करून जाती-जातीत तेढ निर्माण करत आहेत. एका समाजाला टार्गेट करण्याचे काम करत आहेत. धस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे आम्ही मंगळवारी शिक्षकांचे शिष्टमंडळ घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेणार आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
भरती प्रक्रियेत पंकजा मुंडे यांचा कुठलाही संबंध नव्हता
सुरेश धस यांनी स्टेटमेंट केले की, पंकजा मुंडे मंत्री असताना हा घोटाळा झाला आहे. परंतु पंकजा मुंडे त्यावेळी मंत्री नव्हत्या. या भरती प्रक्रियेत पंकजा मुंडे यांचा कुठलाही संबंध नव्हता. 2014 साली इतके सगळे शिक्षक बीडमध्ये आले, तेव्हा 700 लोकांना पगार मिळत नव्हता. दीड वर्ष शिक्षकांनी येथे आंदोलन केले होते. या आंदोलनाला कारणीभूत हे तिघेच आहेत. जागा नसताना भरती करून घेण्यात आली, याचे देखील कारण हे तिघेच आहेत. त्यामुळे सुरेश धस, सय्यद अब्दुल्ला, संदीप क्षीरसागर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बाळासाहेब सानप यांनी केली आहे.
आणखी वाचा