Beed Rain Update : मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने (Rain) दडी मारली असल्याने चिंताजनक परिस्थिती पाहायला मिळत आहे. जून महिना कोरडा गेला. त्यानंतर जुलै महिन्यात देखील देखील अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच आता ऑगस्ट महिन्यात देखील पावसाचा खंड पाहायला मिळत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा (Water Storage) देखील कमी झाला असून, अनेक प्रकल्प कोरडेठाक पडली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आता उपयोजना राबवण्यासाठी हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, बीड (Beed) जिल्ह्यातील 143 धरणांमध्ये केवळ 13.30 टक्केच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी सोमवारी काढला आहे.


यंदा पावसाचे प्रमाण कमी असणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच बीड जिल्ह्यात आतापर्यंत 247.2 मिमी म्हणजेच 76.6 टक्के पाऊस झाले आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात देखील मोठी घट झाली आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाई निर्माण होऊ शकते असे यापूर्वीच सूचित करण्यात आले होते. तसेच विभागीय आयुक्तांनी यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये जलसाठ्यातील अनधिकृत पाणी उपशावर निर्बंध घातल्याबाबत निर्देश दिलेले आहेत. तर, पावसाळा सुरू होऊन जवळपास अडीच महिने एवढा कालावधी लोटला असून, अद्याप बीड जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नाही. 


जलसंपत्तीचा अवैध उपसा होऊ नये तसेच जिल्ह्याचा अवर्षणाचा पूर्वइतिहास पाहता चालू वर्षी पावसाने ओढ दिल्यास पाणीसाठा जास्तीत जास्त कालावधीसाठी पिण्यासाठी वापरता येईल. त्यासाठी पाणी जतन होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पाटबंधारे विभागातील प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.


चिंता वाढली... 


बीड जिल्ह्याची दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख आहे. तर, मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या देखील बीड जिल्ह्यातच पाहायला मिळते. अशात आता जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने चिंता वाढली आहे. पिका माना टाकत असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच जिल्ह्यातील धरणात फक्त 13.30 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने चिंता वाढली आहे. पुढील काळात अपेक्षित पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात वाईट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच नजरा पावसाकडे लागल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


पावसाने पाठ फिरवली, 40 दिवसांत 7 शेतकऱ्यांची आत्महत्या; औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील परिस्थिती