लातूर : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्याची घोषणा शिवशक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा‌ (Karuna Sharma) यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी रेणापूर ते मुबईतील मंत्रायलापर्यंत लॉंग मार्च काढणार असल्याचंही सांगितलं आहे. मराठवाड्यासाठी हजारो कोटींचा निधी जाहीर केला असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचं सांगत त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली. 


शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, यात मराठवाड्याला हजारो कोटीचा निधी दिल्याची घोषणा केली गेली. यावर करुणा शर्मा यांनी जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, मराठवाड्याला हजारो कोटीचा निधी दिला‌ आहे. तो निधी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नुसती घोषणा करून चालणार नाही. ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपण रेणापूर ते मुंबई असा पायी लॉंग मार्च काढणार आहे. 


शेतकऱ्यासाठी ज्याप्रमाणे गोपीनाथ मुंढे यांनी अनेक आंदोलन केली, मोर्चे काढले त्याच धर्तीवर राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना एकजूट करून हा लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या. तसेच राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली. 


रेणापूर विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचा गड मानला जात असे. याच ठिकाणावरून अनेक आंदोलनं उभी करण्यात आली होती. तसेच आंदोलन उभे करण्याचा संकल्प यावेळी करुणा शर्मा यांनी सोडला. करुणा शर्मा लॉंग मार्च काढणार असल्याने मुंडे कुटुंबाच्या अडचणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


रेणापूर, परळी आणि लातूर ग्रामीण भागातील अनेक शेतकरी या लाँग मार्चमध्ये सहभागी होत आहेत. तसेच या लॉंग मार्च मध्ये येणाऱ्या मार्गातील अनेक शेतकरी या मार्चमध्ये सहभागी होत जातील असा विश्वास ही करुणा शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा वाद काय आहे?


करुणा शर्मांची बहीण रेणू शर्मा यांनी सर्वात दोन वर्षांपूर्वी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधाबाबत प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली, तसेच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन अपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते. काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली.


ही बातमी वाचा: