Abdul Sattar : राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा दणका दिल्यानंतर बळीराजा हबकून गेला आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज बीड जिल्ह्यात पाहणीसाठी पोहोचले. सत्तार यांनी आज (9 एप्रिल) बीड जिल्ह्यातील कोळवाडी, धनगर वाडी, पिंपळनई, लिंब गणेश येथे गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहनणी केली. पाहणी करून त्यांनी झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करा तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सत्तार यांनी गारपिटीमुळे झालेल्या शेताची पाहणी केली. बीड तालुक्यातील कोळवाडीत एक किलोमीटरचा डोंगर पार करून अब्दुल सत्तार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांशी सवांद साधून त्यांना मदतीच आश्वासन दिले. 


राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.


मदतीसाठी महिला शेतकऱ्यांचा घेराव


दरम्यान, बीड तालुक्यातील पिंपळनई गावामध्ये गारपिटीमुळे मिरची पिकाचे नुकसान पाहून अब्दुल सत्तार परत येत असताना त्याच गावातील काही महिलांनी तत्काळ मदत जाहीर करावी, यासाठी सत्तार यांना घेराव घातला. यावेळी सरकार सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं म्हणत या सत्तार यांनी या महिलांचे पाय धरत आणि तत्काळ मदत जाहीर करू अस आश्वासन दिले. 


रोजा असूनही शेतकऱ्याच्या बांधावर 


राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असूनही मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर गेल्याने संजय राऊत यांनी त्यांच्या दौऱ्याला पर्यटन असं म्हटलं होतं. यावरून बोलताना म्हणाले की, मी रोजा असतानाही शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी आलो आहे आणि आमच्या या दौऱ्याला संजय राऊत, जर पर्यटन म्हणत असतील तर ते त्यांचं दुर्दैव आहे. दरम्यान, पाहणीवेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, विभागीय कृषी सहसंचालक दिनकरराव जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, चंद्रकांत नवले,अर्जुन पा. गाढे, संचालक राजेंद्र ठोंबरे, सतीष ताठे यांच्यासह महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.


इतर महत्वाच्या बातम्या