नागपूर : भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या पिढीला आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे मोल काय आहे. तिरंगा डौलाने फडकणे म्हणजे काय? त्यासाठी केलेला त्याग व त्यामागचा इतिहास कळावा, यासाठी अमृत महोत्सवी वर्षांमध्ये 75 अधिकारी 75 शाळा असा संबोधन कार्यक्रम करणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत 'हर घर तिरंगा', 'स्वराज्य महोत्सव ', यासंदर्भात आयोजित बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकणार आहे. त्यामुळे हा तिरंगा लावायचा कसा, यासोबतच हा तिरंगा घराघरावर लावण्याचे भाग्य प्राप्त कोणामुळे झाले, स्वातंत्र्याचा लढा काय होता, त्यासाठी कोणी बलिदान दिले, संविधानाचे महत्व अशा अनेक प्रश्नांना येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये पुढील काळात ‘हर घर तिरंगा’ संदर्भातील चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविली जाईल तसेच सर्व अधिकारी एकच संदेश विद्यार्थ्यांना देणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमल किशोर फुटाणे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह वेगवेगळ्या विभागाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.


तिरंगा स्वतः खरेदी करून लावावा


जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने या संदर्भात तयार केलेल्या चित्रफितीचे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये प्रदर्शन होणार आहे. घरामध्ये तिरंगा उभारताना तो अतिशय सन्मानाने व ध्वज संहितेचे पालन करून उभारले गेला पाहिजे. यासाठी 1 ऑगस्टपासून ही मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक नागरिकाला झेंडा उभारण्यासाठी तिरंगा उपलब्ध व्हावा याकरीता महानगरपालिका संपूर्ण नागपूर शहरात आपल्या झोन ऑफिसमध्ये तिरंग्याची उपलब्धता करून देणार आहे. तर प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये तिरंगा उपलब्ध होणार आहे. तसेच ज्या ठिकाणी नगरपालिका, नगरपंचायती आहेत. त्या कार्यालयात देखील तिरंगा उपलब्ध असणार आहे. नागरिकांना नाममात्र शुल्क भरून हा तिरंगा मिळणार आहे. प्रत्येकाने तिरंगा स्वतः खरेदी करून लावावा अशी भूमिका आहे.


प्रत्येक विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाकडून ध्वज


अमृत महोत्सवी वर्षांमध्ये जिल्हा परिषदेने शालेय स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचे मुख्याध्यापक तिरंगा पुरविणार आहे. याशिवाय 11 ऑगस्टला अमृत महोत्सवी रक्षाबंधन, 12 ते 14 ऑगस्टला निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. 15 ऑगस्टला हस्तलिखिताचे विमोचन, 16 ऑगस्टला संपूर्ण शाळांचे विद्यार्थी वृक्षारोपणाच्या कार्यात सहभागी होणार आहेत. तर 17 ऑगस्टला बारा ते अठरा वयोगटातील सर्व मुलांना आरोग्य विभागाच्या मदतीने लसीकरण करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे समन्वय शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र काटोलकर व शिक्षणाधिकारी प्राथमिक रोहिणी कुंभार करणार आहेत.