Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्याचा नामांतराला विरोध करण्यासाठी 12 जुलैला शहरातील भडकल गेट ते आमखास मैदानापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नामांतर विरोधी कृती समितीकडून देण्यात आली आहे. तर या मोर्च्यात तब्बल पन्नास हजार मोर्चेकरी सहभागी होणार असल्याचा दावा सुद्धा कृती समितीकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहराप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा या मोर्च्यात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


असा निघणार मोर्चा...


नामांतरविरोधी कृती समितीचे समन्वयक अय्युब जहागीरदार, गौतम खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद नामांतरविरोधी संघर्ष समितीच्या वतीने 12  जुलै रोजी दुपारी 2 वाजता भडकल गेट ते आमखास मैदानापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार तोंडावर काळी पट्टी बांधून, हातात तिरंगा झेंडा घेऊन हा मोर्चा निघेल. त्यांनतर आमखास मैदानावर सभा पार पडेल. यासाठी 50 हजार मोर्चेकरी जमा होण्याची शक्यता असल्याचा अंदाज कृती समितीने वर्तवला आहे. तर या कृती समितीच्या अध्यक्षपदी खासदार इम्तियाज जलील यांची निवड करण्यात आली आहे. 


काय आहे प्रकरण...


गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याचे नवा बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी मंत्रीमंडळाची बैठक घेतली होती. ठाकरे यांनी आपल्या या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्च्वाचे निर्णय घेतले होते. ज्यात औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यांच्या याच निर्णयानंतर नामांतराचा मुद्दा आणखी एकदा चर्चेत आला आहे. तसेच अनेक राजकीय पक्ष आणि संघटना यांनी नामांतराला विरोध केला आहे. 


शिरसाट भडकले...


औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्यावर आमदार संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. नामांतराला विरोध करणारे जलील काय औरंगाबादचे बादशहा आहेत का? त्यांच्यासारखे कितीही आडवे आले तरी त्यांना आडवे करू, असे शिरसाट म्हणाले. तर औरंगाबादचे नाव लवकरच बदलणार असून, त्यासाठी आम्ही केंद्राकडून मान्यता आणणार असल्याच शिरसाट म्हणाले.