Sant Eknath Maharaj Palkhi: महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमाकांचा पालखी सोहळ्याचे मान असलेल्या पैठणच्या संत एकनाथ महाराज यांची पालखीचे आज प्रस्थान होणार आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस पैठण येथून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तब्बल 19 मुक्काम करत नाथांची पालखी 9 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे.

  


असा असणार पालखी सोहळा प्रस्थान


आज सायंकाळी सूर्यास्तवेळात शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा पवित्र पादुका पालखी सोहळा पंढरपूर येथील सोहळ्यामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रस्तान होणार आहे. या पायी दिंडी पालखी सोहळ्यामध्ये जवळपास 30 ते 35 हजार महिला पुरुष वारकरी दरवर्षीप्रमाणे सहभागी होतात. या पालखी सोहळ्यामध्ये 19 ठिकाणी मुक्काम केल्यानंतर 20 वा मुक्काम थेट पंढरपुरात केला जातो. दरम्यान 9 जुलै रोजी नाथांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. तर पहिला मुक्काम चनकवाडी येथे होणार असून, त्यांनतर पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने निघेल. 


जय्यत तयारी... 


या सोहळ्याचे भव्य प्रस्थान तयारी नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्यावतीने योगेश महाराज, ज्ञानेश महाराज गोसावी पालखीवाले यांनी केले आहे. तसेच या सोहळ्यानिमित्त पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थितीत प्रस्थान सोहळा संपन्न होईल. गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाची परिस्थिती पाहता अनेक भाविकांना पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता आले नव्हते. मात्र यावेळी भाविकांना पालखी सोहळ्याचे आनंद घेता येणार असल्याने, मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 


वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात  


वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, आरोग्य सेवासह सर्व मूलभूत व्यवस्था सोहळा सुरू होण्यापूर्वी करण्याच्या विशेष सूचना दिलेले असताना देखील स्वतः जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोहळ्याच्या नियोजनाकडे कुठलेही लक्ष दिले नसल्याचा तक्रारी वारकऱ्यांनी केल्या आहेत. पहिल्याच मुक्कामाचे गाव असलेल्या चनकवाडी गावाला जाण्यासाठी वारकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे तात्काळ पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कोणताही पर्यायी रस्ता तयार करून देण्यात आला नाही. त्यामुळे नाराज वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. सर्व परिस्थिती पाहता पोलिसांकडून पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.