Aurangabad Paithan Road: गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट 489 कोटींचं असतांना, हे कंत्राट अवघ्या 289 कोटींमध्ये घेण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. अपेक्षित रक्कमेच्या 41.02 टक्के कमी दरात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भावाला हे कंत्राट मिळाले आहे. त्यामुळे एवढ्या कमी दरात दर्जेदार रस्ता कसा होणार असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील यावरून प्रश्न चिन्ह उपस्थित करत,'गडकरी साहेब, औरंगाबाद-पैठण चौपदरीकरण जादूने होणार किंवा कसे? आम्हाला पण समजून सांगावे,' असा टोला जलील यांनी लगावला आहे.


यावर बोलतांना जलील म्हणाले की, गेल्या 20 वर्षापासून चर्चेत असलेल्या औरंगाबाद–पैठण रस्ता चौपदरीकरण कामाची निविदा 490 कोटींची असतांना फक्त 289 कोटीत ठेका कंत्राटदाराला देण्यात आले. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम जादूने होणार किंवा कसे होणार ? हे आम्हाला नितीन गडकरी यांनी समजुन द्यावे, असे जलील म्हणाले.


Raosaheb Danve: 489 कोटींच्या रस्त्याचं काम अवघ्या 289 कोटींमध्ये होणार? रावसाहेब दानवेंच्या भावाला औरंगाबाद-पैठण रस्त्याचं टेंडर


अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होणार...


इम्तियाज जलील म्हणाले की, ओजेएससी एव्हरस्कॉन ठेकेदाराने 41 टक्के टक्के कमी दराने निविदा भरली आहे. परंतु काम होण्यासाठी याव्यतिरिक्त इतरही खर्चाचा समावेश असतो. त्यामध्ये 6 टक्के टक्के रॉयल्टी, 1 टक्के लेबर टॅक्स, 1 टक्का कॉन्टॅक्ट ऑल रिस्क्यु पॉलिसी, 3 टक्के लिकेजेस, 0.3 टक्के अ‍ॅडिशनल बँक गॅरंटी असे मिळून एकूण 52.03 टक्के होत आहे. म्हणजे निविदेच्या फक्त 47.97 टक्क्यातच रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद–पैठण चौपदरीकरणाचे काम एक तर अत्यंत निकृष्ट दर्जाचे होणार किंवा फक्त पैसे उचलुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येणार असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.


दानवेंच्या भावाला मिळणार काम...


औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ आणि भाजपचे पदाधिकारी भास्कर दानवे यांनी 489 कोटी रुपयांचे काम फक्त 289 कोटींमध्ये म्हणजे 41.02 टक्के कमी दरात करण्याची तयारी दर्शवली आहे. तर येत्या महिनाभरात तांत्रिक बाबींची पूर्तता करून जानेवारी 2023 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यानंतर दीड वर्षात रस्ता तयार होणार असल्याचं भास्कर दानवे म्हणाले आहे.