Women  Agriculture College: खास बाब म्हणून औरंगाबाद (Aurangabad) येथे राज्यातील पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरू केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली आहे. औरंगाबादेत महिला कृषी महाविद्यालय सुरू करावे यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सत्तार यांनी ही घोषणा केली आहे. 


औरंगाबाद येथे महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबत सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सादर केलेल्या प्रस्तावास कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 2 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली असल्याचे देखील सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अखेर औरंगाबादमध्ये राज्यातील पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु करण्याची घोषणा कृषीमंत्री सत्तार यांनी केली.


सतीश चव्हाण यांची आग्रही भूमिका 


औरंगाबाद जिल्ह्यातील जमीन अत्यंत सुपीक असून जिल्ह्यात जायकवाडी, शिवना टाकळी, गिरिजा, नांदूर मधमेश्वर असे मोठे प्रकल्प आहेत. उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या औरंगाबाद परिसरातील मुलींना शेतीविषयक ज्ञान उपलब्ध व्हावे व शेती सुधारण्यास, पर्यायाने आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होईल असा मुद्दा सतीश चव्हाण यांनी सभागृहात मांडले. म्हणून औरंगाबाद जिल्ह्याचे पहिले कृषिमंत्री म्हणून आपण ठाम भूमिका घ्यावी व खास बाब म्हणून औरंगाबाद येथे महिला कृषी महाविद्यालय सुरू करावे अशी आग्रही भूमिका सतीश चव्हाण यांनी सभागृहात मांडली होती. 


अन् कृषी मंत्र्याची घोषणा...


सतीश चव्हाण यांच्या प्रश्नावर उत्तर देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र औरंगाबादेत सुरू करण्याचे विचार-धीन असल्याचे सांगितले. मात्र खास बाब म्हणून औरंगाबादेत महिला कृषी महाविद्यालय सुरू करा, अशी मागणी सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली. त्यामुळे अखेर कृषिमंत्री सत्तार यांनी महिलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी खास बाब म्हणून एक महिला कृषी महाविद्यालय औरंगाबादेत सुरू केले जाईल अशी घोषणा सभागृहात केली.


मराठवाड्याला फायदा होणार...


औरंगाबाद शहर मराठवाड्यातील शिक्षणाचा हब बनला आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील मुली देखील शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात येतात. यात अनेक मुली शेतकरी कुटुंबातून येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींना कृषी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी या नवीन कृषी महाविद्यालयाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे कृषीमंत्री यांच्या या निर्णयाचा औरंगाबादसह मराठवाड्याला होणार आहे. 


Lumpy Skin Disease: कृषिमंत्री सत्तारांच्या जिल्ह्यात अवघ्या साडेतीन महिन्यांत लम्पीमुळे एक हजार जनावरांचा बळी