Aurangabad News: औरंगाबादमधील जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) परिसरात धक्कादायक घटना समोर आली असून, धरणाच्या समोर असलेल्या पुलावरून कार थेट पाण्यात कोसळली. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून वाहनाची काच फोडून तिघांना उपस्थित नागरिकांनी वाचवले आहे. तर या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहे. तर कारचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण शहरातून दक्षिण जायकवाडी, खुले कारागृह, जुने कावसान, शेवगावकडे जाणाऱ्या नाथसागर धरणाच्या समोर असलेल्या पुलावरून नेहमी वाहतूक सुरु असते. मात्र या पुलाला सुरक्षा कठडे नाहीत. दरम्यान रविवारी सकाळी जुने कावसान येथील उद्धव भगवान मापारी, वर्षा उद्धव मापारी, राम अरुण चेडे हे कारने (एम.एच 20 एनजे 2778) प्रवास करीत होते. 


कारची काच फोडून जखमींना बाहेर काढले!


मात्र अचानक त्यांची कार पुलावरून गोदावरी नदीच्या पाण्यात कोसळली. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर काही नागरिकांनी पाण्यात उतरून कारची काच फोडून जखमी तिन्ही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर जखमी तिघांना तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 


मोठा अनर्थ टळला! 


सध्या जायकवाडी धरणातून सोडण्यात येणारा पाणी बंद करण्यात आले आहे. तसेच पुलाखाली पाण्याचे प्रमाणे देखील कमी होते. त्यामुळे कार पाण्यात पडल्यावर वाहून गेली नाही. तसेच पुलाजवळ अडकली. मात्र तरही कार पाण्यात अर्धी बुडाली होती. परंतु तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत, कारमध्ये अडकलेल्या तिघांची काच फोडून सुटका केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. 


पुलावर लोखंडी कठडे बसवण्याची मागणी! 


पैठण शहरातून दक्षिण जायकवाडी, खुले कारागृह, जुने कावसान, शेवगावकडे जाणारे वाहनधारक नाथसागर धरणाच्या समोर असलेल्या पुलावरून वाहतूक करतात. विशेष म्हणजे धरणातून पाणी सोडल्यास हा पूल बंद ठेवण्यात येतो. मात्र सद्या धरणाचे दरवाजे बंद असल्याने वाहतूक सुरु आहे. पण या पुलावर सुरक्षा दृष्टिकोनातून लोखंडी कठडे नसल्याने अनेकदा अपघात होतात. त्यामुळे पुलावर सुरक्षा दृष्टिकोनातून लोखंडी कठडे बसविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र जायकवाडी प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Garbage Depot: औरंगाबादचा कचरा पुन्हा पेटला! तब्बल 36 तासांनंतर आगीवर नियंत्रण