Aurangabad News: गेल्या काही वर्षांपूर्वी औरंगाबादचा कचरा प्रश्न (Aurangabad Garbage Issue) देशभरात गाजला होता. कारण याच कचऱ्याच्या मुद्द्यावरून औरंगाबादमध्ये दंगल झाली होती. आता पुन्हा एकदा औरंगाबादचा कचऱ्याच्या मुद्दा चर्चेत आला आहे. कारण औरंगाबादच्या पडेगाव येथील महापालिकेच्या कचरा प्रक्रिया केंद्रावरील (Garbage Depot) कचऱ्याच्या ढिगाऱ्याला शुक्रवारी रात्री आग लागली. तब्बल 36 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, 48 तासानंतरही धुराचे लोट सुरूच असून आग धुमसत आहे. त्यामुळे धुमसत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाण्याचा मारा केला जात आहे.


नारेगाव येथील कचरा केंद्र बंद झाल्यावर महानगरपालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागात नवीन कचरा प्रकल्प उभारले. दरम्यान पडेगाव येथे देखील कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात आला आहे. मात्र याच कचरा केंद्राला शुक्रवारी आग लागली. सुरवातील छोटी आग असल्याचं वाटत असताना भडका वाढत गेला. त्यामुळे परिसरात धुराचे लोट सुरु झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन व घनकचरा विभागाचे कर्मचारी तैनात असून आतापर्यंत 35 टँकर पाणी मारण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 


रात्रभर पाण्याचा मारा


पडेगाव येथे दररोज 150  मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू आहे. इथे कचऱ्याचे ढीग साचल्याने त्यात मिथेन वायू तयार झाला आहे. सध्या हिवाळा सुरू असून सकाळी आणि संध्याकाळी वारा वाहत आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास कचराडेपोतील ढिगाऱ्याला आग लागली. पाहता-पाहता आग वाढत गेली. आगीचे लोळ उठल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान महापालिकेचे घनकचरा कक्षप्रमुख उपायुक्त विभाग तथा सोमनाथ जाधव यांनी तातडीने कचराडेपोवर धाव घेत अग्निशमन विभागाचे तीन बंब घटनास्थळी बोलावून घेतले. अग्निशमनच्या तीन बंबांनी रात्रभर पाण्याचा मारा सुरू ठेवला. त्यासोबतच मनपाचे तीन टँकरदेखील आणण्यात आले होते. 


पुन्हा आग लागली! 


आगीवर जरी नियंत्रण मिळवण्यात यश आले असले, धुराचे लोट सुरूच असून आग धुमसत आहे. त्यामुळे एका टँकरद्वारे पाण्याचा मारा सुरू ठेवण्यात आला. धुराचे लोट उठल्यामुळे परिसरात सर्वत्र धूर पसरल्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. कचऱ्याच्या ढिगातून धूर येत असल्यामुळे कचरा पसरवून त्यामध्ये पाणी मारले जात होते. दरम्यान, शनिवारी रात्री वारा सुटल्याने पुन्हा आग लागली. तर आग अटोक्यात आणण्यासाठी पुन्हा अग्निशमनचे तीन बंब व तीन टँकरद्वारे पाण्याचा मारा सुरू केला. रविवारी दिवसभर पाण्याचा मारा सुरू ठेवल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असले, तरी धुराचे लोट सारखे उठत आहेत. त्यामुळे कचऱ्याच्या ढिगांवर एसटीपी प्लॅन्टच्या टँकरने पाणी आणून मारण्यात येत आहे. आतापर्यंत 35 टँकर पाणी मारण्यात आले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad News: औरंगाबादच्या सिटी बससेवेला चार वर्ष पूर्ण; आतापर्यंत दीड कोटी नागरिकांनी केला प्रवास