Aurangabad Crime News: औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयातील बीकॉमच्या विद्यार्थिनीने  अभ्यासाच्या तणावातून वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने रजिस्टरमध्ये अडीचपानी सुसाइड नोट लिहून ठेवली आहे. आरती सर्जेराव कोल्हे (19, रा. गुरूपिंप्री, ता. घनसावंगी, जि. जालना) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरतीने नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत यश मिळवले होते. त्यानंतर पुढे तिने देवगिरी कॉलेजमध्ये बी. कॉम. च्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला. दरम्यान ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ती देवगिरी कॉलेजमधील मुलींच्या वसतिगृहात राहायला आली होती. आरतीच्या खोलीत एकूण पाच मुली राहायच्या. तर आरती नियमित कॉलेजमध्ये जात होती. दोन दिवसांपूर्वी ती आपल्या एका नातेवाईकाकडे गेली होती. त्यानंतर शुक्रवारी ती वसतिगृहात परतली. खोलीतील इतर चार मुली कॉलजला जाताच आरतीने गळफास घेतला. 


अडीचपानी सुसाइड नोट....


आरतीने लिहलेल्या सुसाइड नोटमध्ये तिने लिहलं आहे की,  मी खूप साधी आहे. बारावीपर्यंत खेडेगावात शिकले. मला शहरी वातावरणाची सवय नाही. शहराशी जुळवून घेताना कुचंबणा होतेय. जीवन खूप सुंदर आहे. माझे स्वप्न टाटा बिलांसारखे मोठे होण्याचे आहे. माझ्या सर्व मैत्रिणी चांगल्या आहेत, पण तीन वर्षांचे बी. कॉम. आहे. सहा सेमिस्टर शिकायचे आहेत. हे झेपेल की नाही, याबाबत माझ्या मनात शंका आहेत. मी गेल्यावर कोणीही होस्टेल सोडू नका,' असा सल्ला देत, दोन पाने लिहिल्यानंतर अर्ध्या पानात तिने 'अलविदा' हा मथळा दिला आहे. 


कुटुंबीयांकडून घातपाताचा आरोप...


या घटनेच्या मागील कारणाचा शोध वेदांतनगर पोलीस घेत आहेत. तर आमची मुलगी फाशी घेऊ शकत नाही, कुणीतरी काहीतरी केलं अस पालक सांगताय. त्यामुळे घातपात असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केलाय. तसेच त्यादृष्टीने तपास करण्याची मागणी पालकांनी केलीय. आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वी आरतीने त्याचा भाऊ गणेशला वसतिगृहात त्रास होत असल्याची माहिती दिली होती. शिवाय या संदर्भात वसतिगृहात लेखी तक्रार देखील केली होती. असेही तिच्या भावाने सांगितलं आहे.


महत्वाच्या बातम्या...


मोठी बातमी: हायवाच्या धडकेत तिघांचा मृत्यू; औरंगाबादच्या बिडकीन-शेकटा रोडवरील घटना


Aurangabad: पावणेदोन लाखांचा आयपॅड, सव्वादोन लाखांचा मोबाईल आणि घड्याळ; आयुक्तांकडून शासकीय पैशांची उधळपट्टी?