Aurangabad News: औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातून गेलेल्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 52 वरील कन्नड- चाळीसगाव औट्रम घाटातून बोगदा करण्यात यावा या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरवात झाली. यावेळी शेकडो शिवसैनिक आणि परिसरातील गावकरी आंदोलंनास्थळी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले.  


धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होऊन यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. मात्र औट्रम घाटात रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होते. या महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे कन्नड- चाळीसगाव औट्रम घाटातून बोगदा करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून आणि वाहनधारकांनी अनेकदा करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून यावर कोणतेही प्रत्यक्षात हालचाली होत नसल्याने अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


'या' आहेत मागण्या... 



  • बोगद्याच्या कामाला तत्काळ मंजुरी देण्यात यावी.

  • कन्नड -वैजापूर, गल्ले बोरगाव, देवगाव, या राज्य मार्गावरील भुयारी मार्ग कामास मंजुरी देऊन काम सुरू करण्यात यावे. 

  • गल्ले बोरगाव ते टाकळी चापानेर व कन्नड ते अंधानेर या प्रमुख जिल्हा मार्ग वरील भुयारी मार्ग तयार करण्यात यावे. 

  • करोडी ते तेलवाडी टोल नाक्यापर्यंत खराब झालेला राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात यावे. 

  • तसेच राष्ट्रीय महामार्गालगत वृक्ष लागवड करण्यात यावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


महामार्गावर वाहनांच्या रांगा


अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, वाहनधारक, चालक, मालक, नागरिकांनी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कन्नड- चाळीसगाव औट्रम घाटातून बोगदा करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्ते यांच्याकडून केली. तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. तर जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती. यामुळे दोन्ही बाजूने ट्राफिक जाम झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निवदेन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 


महत्वाची बातमी...


Sugarcane: पुन्हा अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटणार! औरंगाबाद विभागात सरासरी 20 टक्क्यांनी वाढले ऊसाचे क्षेत्र