Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना बत्ती गुलचा सामना करावा लागल्याची घटना समोर आली आहे. भुमरे यांच्या दातांवर उपचार सुरु असतानाच अचानक वीज गेली. त्यामुळे आता उपचार कसा करावा असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. अखेर मोबाईल उजेडात भुमरे यांच्या दातांवर उपचार करण्यात आले. मात्र कक्षात अंधार पडल्याने पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. 


त्याच झालं असे की, पालकमंत्री झाल्यावर भुमरे यांनी पहिल्यांदाच औरंगाबाद येथील शासकीय कार्यालयांना (Government Office) भेट देत आढावा घेतला. याचवेळी त्यांनी शासकीय दंत रुग्णालयात सुद्धा भेट देऊन, पाहणी केली. दरम्यान यावेळी त्यांनी आपल्या दातांना होणाऱ्या त्रासाबद्दल उपस्थित डॉक्टरांना सांगत, उपचार करण्यास सहमती दर्शवली. मात्र भुमरे यांच्या दातांवर उपचार सुरू असतानाच अचानक वीज गेली. त्यामुळे येथील डॉक्टरांसह अधिष्ठातांचीही भंबेरी उडाली. कक्षात अंधार पडल्याने पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तर काहीच सुचत नव्हते. यावेळी भुमरे यांचे स्वीय साहाय्यक यांनी कक्षात धाव घेतली आणि शेवटी सर्वांच्या मोबाइलच्या उजेडात भुमरे यांच्यावर उपचार करण्यात आले.


अचानक वीज गेल्याने उडाला गोंधळ...


दातांचा एक्सरे काढल्यानंतर रूट कॅनॉलसाठी पालकमंत्री भुमरे दंत रुग्णालयात आले. पालकमंत्री उपचारासाठी येणार म्हटल्यावर अधिष्ठातासह सर्वच डॉक्टर्स हजर होते. स्वतंत्र कक्षात पालकमंत्र्यांवर उपचार सुरू असताना अचानक वीज गेल्याने सर्वांचा गोंधळ उडाला. कक्षात अंधार पडल्याने पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. पण आता करायचं काय म्हणत सर्वांनी आपापल्या मोबाईलचे टॉर्च सुरु केले आणि मोबाइलच्या उजेडात भुमरे यांच्यावर रूट कॅनॉल उपचार सुरू करण्यात आले.


भुमरेंनी तातडीने जनरेटरच्या प्रस्तावाला मंजुरी दिली...


भुमरे यांच्या दातांवर उपचार सुरु असतानाच वीज गेल्याने अंधार पडला होता. त्यामुळे त्यांनी जनरेटरबाबत विचारणा केली. मात्र गेल्या पाच वर्षांपासून जनरेटरची मागणी प्रलंबित असल्याची माहिती उपस्थित डॉक्टरांनी दिली. त्यामुळे भुमरे यांनी जनरेटरसह इतर मागण्यांच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरीचे निर्देश दिले. तर नवीन जनरेटर येईपर्यंत कोविड केअर सेंटरमधील जनरेटर आणावे असेही निर्देश भुमरे यांनी यावेळी दिले. मात्र या घटनेची शहरात मोठी चर्चा पाहायला मिळाली. 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: जिल्ह्यात मंत्री झाले फार, त्यामुळे मिळेना सरकारी कार; प्रशासनाचे होतायत हाल


युवकांचा आवाज दाबण्याची असुरी शक्ती तुम्हाला कुठून आली?; विनोद पाटील गिरीश महाजनांवर संतापले