Imtiyaz Jaleel: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक व्हिडिओ ट्वीट (Video (Tweet)) करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान आवास योजनेवरून (Pradhan Mantri Awas Yojana) प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. सोबतच औरंगाबाद महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation) पंतप्रधान आवास योजने अंतर्गत एकही घर उभा केला असल्याचं दाखवल्यास मी मोदींना बक्षीस द्यायला तयार असल्याचा खोचक टोला लगावला आहे. तर औरंगाबाद शहरातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे कधी मिळणार यापेक्षा या घरकुल योजनेचा कंत्राट कुणाला मिळणार यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांना अधिक रस असल्याचा आरोपही जलील यांनी केला आहे.  


स्थानिक प्रशासनाच्या वादामुळे गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद येथील पंतप्रधान आवास योजना रखडली आहे. तर यावरून अनेकदा जलील यांनी पत्रकार परिषदेतून स्थानिक प्रशासनावर आरोप देखील केले होते. मात्र आता ही योजना संपण्यासाठी अवघ्या चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असतांना औरंगाबाद जिल्ह्यातील घरकुल योजनेसाठी नियोजित जागेचा अंतिम निर्णय होऊ शकला नाही. तर ज्या जागेचा निर्णय झाला आहे, त्याठिकाणी मोठ-मोठ्या खदानी असल्याचे समोर आले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी अवघ्या चार दिवसांचा कालावधी शिल्लक असून, औरंगाबाद महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेतून एक तरी घरी बनवलं असल्याचे दाखवल्यास मोदींना मी बक्षीस देण्यासाठी तयार असल्याचे जलील म्हणाले आहेत. 


मोदींचा व्हिडिओ ट्वीट!


जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केलाय. ज्यात पंतप्रधान मोदी हे 2022 पर्यंत असा एकही व्यक्ती असणार नाही की, ज्याला स्वतःच पक्क घर नसेल,असं सांगत आहेत. फक्त घरचं नाही तर त्यात एलईडी लाईट,पाण्याचा नळ, नळाला पाणी, गॅसची पाईपलाईन असेल. आम्ही काँग्रेस सारखं चार भिंती उभा करत नाही, तर पक्क घर उभा करून देणार असल्याचा दावा देखील यात मोदी करतांना पाहायला मिळत आहे. तर त्यांच्या याच व्हिडिओला सपनो के सौदागर असे कॅप्शन देखील जलील यांच्याकडून देण्यात आले आहेत. 


दानवे,कराड यांच्यावर आरोप...


पंतप्रधान आवास योजनेवरून जलील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर देखील आरोप केला आहे. औरंगाबाद शहरात होत असलेल्या आवास योजनेशी येथील दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना काहीही देणघेण नसल्याचं जलील म्हणाले. तर शहरातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे कधी मिळणार यापेक्षा या घरकुल योजनेचा कंत्राट कुणाला मिळणार यात रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांना अधिक इंटरेस्ट असल्याचा आरोपही जलील यांनी केला आहे.  


सुभाष देसाईंच्या काळात एमआयडीसी जमीन विक्रीचा एक हजार कोटींचा घोटाळा; जलील यांचा गंभीर आरोप