Aurangabad News: राज्यभराचं लक्ष लागून असलेल्या अंधेरीतील पोटनिवडणुकीतून शेवटच्या क्षणी भाजपने माघार घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. तर यावर प्रतिक्रिया देतांना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपची फाटली असेल म्हणून त्यांनी माघार घेतली असल्याची जहरी टीका जलील यांनी केली आहे.


एबीपी माझाशी बोलतांना जलील म्हणाले की, अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीतून ज्याप्रमाणे भाजपने माघार घेतली आहे, त्याचा एकच अर्थ होतो ते म्हणजे भाजपची फाटली आहे. त्यांना माहित झालं असावे की, एकदा मराठी शक्ती आपल्या विरोधात उभं राहिली तर आपले काय होऊ शकते. याचा अंदाज आल्याने त्यांनी माघार घेतली असावी असे जलील म्हणाले. 


याचा मला आनंद वाटतयं...


तर त्यांच्या या निर्णयाशी मला काहीही देणघेण नाही. मात्र एक मराठी माणूस म्हणून मला आनंद आहे. कारण या देशात गुजराती लोकांनी जे आपलं वर्चस्व वाढवलं आहे. मुंबईत सुद्धा मराठी माणसाच्या डोक्यावर बसून या लोकांनी आपला वर्चस्व वाढवला आहे. त्यामुळे त्यांचा एक आमदार येणार होता मात्र आता तो येणार नसल्याचा मला आनंद वाटत असल्याचे जलील म्हणाले.


भाजपच लक्ष फक्त मुंबई महानगरपालिकेवर 


मुंबई महानगरपालिका निवडणुका भाजपासाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे भाजप संपर्ण ताकद तिथे लावणार आहे. त्यांचा एकंच उद्देश असून, मुंबई महानगरपालिका एकदा आपल्या ताब्यात घेतली तर मराठी माणूस, मराठी माणसांचे पक्ष आपोआप संपवून जातील. त्यांना माहित आहे की, शिवसेनेचं सर्व काही मुंबई महानगरपालिकेवर अवलंबून आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका एकदा ताब्यातून गेली तर शिवसेना संपवून जाईल हे भाजपला माहित आहे. तर अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत आपला पराभव झाला तर आगामी महानगरपालिका निवडणूक कठीण जाईल हे भाजपला माहित आहे. यामुळेच भाजपने माघार घेतली असल्याचं जलील म्हणाले. 


राज ठाकरेंवर टीका 


हे सर्व नाटक सुरु आहे. यांना वाटते लोकांना काहीच समजत नाही. हे सर्व ठरलेलं होतं. भाजपला सुद्धा एक माणूस हवा होता की, ज्यांना त्यांना मोठ करायचं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना मोठं करण्यात येत आहे. असे चित्र निर्माण केले की, त्यांनी पत्र लिहले आणि आम्ही माघार घेतली. आता यामुळे राज ठाकरे मोठे झाले आणि भाजपचा हेतू देखील पूर्ण झाला. 


महत्वाच्या बातम्या...


Bhasakar Jadhav On Narayan Rane: 'शिवसेनेने काही केले नाही, मग तू....', भास्कर जाधव यांची नारायण राणेंवर बोचरी टीका