Gram Panchayat Election: औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतसाठी आज मतदान प्रकिया पार पडत आहे. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून,  जिल्ह्यातील अनेक आमदार आणि मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील बिडकीन ग्रामपंचायत आणि वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या वैजापूर मतदारसंघातील महालगाव ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 


यामुळे झाली चुरशीची लढत... 


शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील बिडकीन गावात रॅली काढत शिंदे गटाचे मंत्री भुमरे यांना आव्हान दिले होते. तर त्याच गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रॅली काढली होती. विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहून आदित्य ठाकरे यांनी रॅली काढली तेथूनच मुख्यमंत्री यांची रॅली निघाली होती.आता याच गावात ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. त्यामुळे याठिकाणी शिंदे गट विरोधात ठाकरे गट असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. 


तर याच बरोबर वैजापूर तालुक्यातील महालगावात शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्यावर ठाकरे गटाकडून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप झाला होता. गेल्या महिन्यातच झालेल्या या राड्याची राज्यभरात चर्चा झाली होती. आता त्याच गावात आज ग्रामपंचायत निवडणूक होत असून, या गावात देखील ठाकरे गट विरोशात शिंदे गट थेट सामना पाहायला मिळणार आहे. 


असा रंगणार सामना...


जिल्ह्यात मुदत संपलेल्या 216 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत थेट सरपंचपदासाठी 1092,तर सदस्यपदासाठी 5481 अशा 6573 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी 371 जणांचे अर्ज छाननीत बाद ठरले. तर 1900 जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने सध्या सरपंचपदासाठी 611 तर सदस्यासाठी 3626 असे 4237 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. दरम्यान, यात थेट सरपंचपदी 14 तर सदस्यपदी 308 उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवार रिंगणात शिल्लक नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.


पोलिसांचा मोठा बंदोबस्त...


औरंगाबाद जिल्ह्यातील होत असलेल्या 216 ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील गावात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर खुद्द पोलीस अधीक्षक आणि महत्वाचे अधिकारी निवडणूकीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी छावणीचे स्वरूप पाहायला मिळत आहे. सकाळी साडेसात वाजेपासून सुरु झालेल्या मतदान प्रकिया सद्या तरी सुरळीत सुरु आहे.