Aurangabad Crime News: आईनंच पोटच्या मुलांचा गळा घोटून त्यांची हत्या केल्याची घटना औरंगाबादच्या (Aurangabad) सादात नगर परिसरात 6 फेब्रुवारीला उघडकीस आली. तर अल्पवयीन मुलांचा आईनं झोपेतच जीव (Crime News) घेतल्याचे समोर आल्याने शहरात खळबळ उडाली होती. मात्र आईने आपल्यास पोटच्या लेकरांचा जीव का घेतला याचे कारण समजू शकले नव्हते. दरम्यान पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी महिलेने अखेर हत्या केल्याचं कबूल करत, “मला मुलं सांभाळणं असह्य झालं होतं. त्यामुळे चिडचिड व्हायची, म्हणून दोन्ही मुलांचा जीव घेतल्याच महिलेने सांगितले आहे. याप्रकरणी औरंगाबादमधील सातारा पोलीस स्थानकात (Satara Parisar Police Station)  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  


महिलेचा कबुलीजबाब...


सादातनगरमध्ये राहणाऱ्या आलिया फहाद बसरावी (वय 22 वर्षे) या महिलेने आपल्याच दोन मुलं अदीबा फहाद बसरावी (वय 6 वर्षे) आणि अली बिन फहाद बसरावी (वय 4 वर्षे) यांचा झोपेत असतानाच गळा दाबून हत्या केली होती. दरम्यान पोलिसांनी आरोपी आई आलियाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता. दरम्यान महिलेने हत्या केल्याचे देखील कबूल केले होते. मात्र हत्या करण्याचे कारण महिला सांगत नव्हती. तसेच पोलिसांना तपासात सहकार्य देखील करत नसल्याचे समोर आले होते. दरम्यान अखेर महिलेने हत्येचे कारण सांगत कबुलीजबाब दिला आहे. माझ्यासाठी मुलं सांभाळणं असह्य झालं होते. माझ्याकडून त्यांचं काहीच सहन होत नव्हतं. तर यामुळे नेहमी चिडचिड व्हायची. त्यामुळे मला हे सर्व संपवून एकदाचे बाहेर जायचे होते, म्हणून मी दोन्ही मुलांची हत्या केल्याचं महिलेने पोलीस चौकशीत सांगितले आहे. तर माझ्या हातून कसे झाले कळले नाही, पण झाले,असेही तिने यावेळी सांगितले. विशेष म्हणजे महिलेने सात दिवसांच्या पोलिस कोठडीत अनेकदा जबाब बदलल्याने तपास करणाऱ्या पोलिसांनाही निष्कर्षापर्यंत जाणे अवघड झाले होते. 


अन् परिसरात खळबळ उडाली 


औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात दोन अल्पवयीन सख्या बहिणभावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती 6 फेब्रुवारीला पोलिसांना मिळाली होती. रात्री आई-वडिलांसोबत जेवण करुन दोघे बहिण-भाऊ झोपले. मात्र सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यामुळे कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल केल्यावर डॉक्टरांनी अदीबा आणि अली या दोन्ही बहीण भावाला मृत घोषीत केलं. मात्र पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत चौकशी केली असता आईनेच आपल्या मुलांची हत्या केली असल्याचे समोर आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. 


अवघ्या पंधराव्या वर्षे लावलं लग्न...


आपल्या दोन्ही मुलांचा जीव घेणाऱ्या आलियाचा फहाद बसरावी सोबत लग्न झाले होते. मात्र आलियाचा सध्याचे वय 22 वर्षे असून, मोठी मुलगी सहा वर्षांची होती. त्यानुसार आलियाचा अवघ्या पंधराव्या वर्षे लग्न झाल्याचं अंदाज आहे. त्यामुळे अल्पवयीन वयातच लग्न लावण्यात आले आणि त्यात दोन मुलं झाली. त्यामुळे मुलांचं संगोपन करताना तिला चिडचिड होत असल्याचं बोलले जात आहे. पण असे असलं तरीही स्वतःच्या पोटच्या मुलांचा गळा घोटताना या निर्दयी आईला थोडीशीही दया आली नाही. 


संबंधित बातमी: 


Aurangabad Crime: माता न तू वैरीणी... आईनं पोटच्या मुलांना झोपेतच संपवलं; आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट