Aurangabad News: राज्यभरात गाजलेल्या मराठवाड्यातील तीस-तीस घोटाळ्यातील आर्थिक व्यवहारातून एका 40 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तत्काळ पथक रवाना करत अवघ्या सहा तासात या व्यक्तीची सुटका केली आहे. याप्रकरणी पैठण पोलिसांनी तिघांना अटक केली असून, दोन जण फरार झाले आहेत. मात्र या घटनेने पुन्हा एकदा तीस-तीस घोटाळ्याची चर्चा समोर आली आहे. 


कविता दिलीप चव्हाण (वय 35 वर्षे रा.बोकुड जळगाव तांडा ता. पैठण जि.औरंगाबाद)  यांनी पैठण पोलिसात बुधवारी आपल्या पतीचं अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. दिलीप चव्हाण हे बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पैठण येथील रजीस्ट्री ऑफीसमध्ये शेत जमीन नावावर करण्यासाठी आले असता, काळया रंगाची ब्रेझा कारमध्ये असलेल्या लोकांनी दिलीप चव्हाण यांचे अपहरण केल्याचे तक्रारीत म्हंटले होते. सोबतच कृष्णा तरमळे नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे कविता यांच्या फिर्यादीवरून पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सहा तासात सुटका...


गुन्हयाचे गांभीर्य ओळखून औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल आणि पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तात्काळ पथक आरोपींच्या शोधात रवाना केले. दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रीक आधारावर गुन्हयातील अपहरणकर्ते यांचा पथकाने पत्ता शोधून काढला. त्यामुळे अवघ्या सहा तासामध्ये आरोपींचा छडा लावून दिलीप चव्हाण यांची पोलिसांनी सुखरुप सुटका केली. 


तीस-तीस घोटाळ्यातील व्यवहार...


मारोती मुरलीधर नागे, रामनाथ मुरलीधर कोल्हे, दिनेश प्रमोद राठोड, ( तीन्ही राहणार बोकुडजळगाव तांडा ता. पैठण जि. औरंगाबाद) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर याच गुन्हयात कृष्णा कल्याण तरमळे, पांडूरंग सदाशिव नागे (दोन्ही राहणार बोकुड जळगाव ता. पैठण) हे फरार आहेत. तर हे अहपहरण तीस-तीस आर्थीक घोटयाळयातील पैशाच्या व्यवहारावरून झाले आहे. हा व्यवहार 25 लाखाचा असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.