औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांमध्ये बँकावरील सशस्त्र दरोड्यांचे प्रमाण वाढले आहे. या महिन्यात झालेल्या दरोड्यांवेळी दोन बँक कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. दरोडेखोरांच्या भीतीने बँकेत कॅशियर (लेखापाल) म्हणून काम करताना जीव मुठीत धरुन काम काम करावे लागत आहे.


बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीती वातावरण असल्यामुळे बँक असोसिएशनने (बँक संघटनांनी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बँकांसमोर सशस्त्र सुरक्षारक्षक नेमण्याची परवानगी मागितली आहे. तसेच बँकांची आणि एटीएमची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.

नाशिक आणि जळगावच्या बँक आणि फायनान्स कंपनीच्या दरोड्यानंतर बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच बँकेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे संशयाने पाहिले जात आहे. कधी कोण बँकेत प्रवेश करेल आणि सशस्त्र दरोडा टाकेल याचा नेम राहिलेला नाही.

या महिन्यात थरकाप उडवणाऱ्या दरोड्यांच्या दोन घटना जळगाव आणि नाशिकमध्ये घडल्या आहेत. या दोन दरोड्यांमध्ये दोन बँक कर्मचाऱ्यांवर गोळीबार झाल्याने त्यांना त्यांना जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे बँकेच्या कॅश काऊन्टरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

2019 मधील बँक दरोड्याच्या घटना
8 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यातील काळे गावात यशवंतपूर सहकारी बँकेवररील दरोड्यात 1 कोटी 25 लाख रुपये लुटले गेले
22 फेब्रुवारी रोजी पुण्यातील स्टेट बँकेच्या मार्केट यार्ड शाखेवर दरोडा पडला. त्यात 28 लाख रुपये लुटले
11 मार्च रोजी सातारा जिल्ह्यातील शेणोली गावात महाराष्ट्र बँकेवर दरोडा पडला. या सशस्त्र दरोड्यात बँक ऑफ महाराष्ट्रचे 22 लाख आणि सोने लुटले.
17 मार्च रोजी भोसरीतील बोराडे वस्तीवरील एटीएम फोडून 35 लाख रुपये लंपास झाले.
4 जून रोजी नागपूरच्या काटोल भागात दरोडेखोरांनी एटीएम फोडून 16 लाख रुपये लुटले.
14 जून रोजी नाशिकच्या मुथूट फायनान्स कंपनीवर पडलेल्या सशस्त्र दरोड्यात एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला
18 जूनला जळगाव जिल्ह्यातील निबोळमध्ये बँक ऑफ बडोदावर दरोडेखोरांनी गोळीबार केला. त्यात एक बँक कर्मचारी मृत्यूमुखी पडला.

एकीकडे बँकांवरील दरोडे वाढत आहेत, तर दुसरीकडे एटीएमबाहेर सुरक्षारक्षक नेमणे परवडत नसल्याने अनेक बँका एटीएमबाहेरील सुरक्षारक्षकांना हटवत आहेत.

नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोडा, गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू | एबीपी माझा



बँक संघटनांच्या मते कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. परंतु एटीएमबाहेर सुरक्षारक्षक नेमण्यास टाळाटाळ केली जात आहे. बँकांसमोर सशस्त्र सुरक्षारक्षक नेमता येत नाही, कारण पोलीस वगळता इतर कोणालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी नाही.

वज्रेश्वरी मंदिरात चोरीची हॅटट्रिक | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा


बँकेवर सशस्त्र दरोडा पडतो त्यावेळी कॅशियरचा जीव धोक्यात असतो. गेल्या काही दिवसांपासून दरोडे वाढत असल्याने कॅशियर सोडून कोणतेही काम द्या, अशी मागणी कॅशियर करत आहेत.