औरंगाबाद : न विचारता दोन बिस्किटं खाल्ली म्हणून चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संस्थाचालकाने डोकं फुटेपर्यंत मारहाण केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील निल्लोडच्या माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात हा प्रकार घडला.


निरंजन सतीश जाधव असं विद्यार्थ्याचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी संस्थाचालक महाराज रामेश्वर महाराज पवारविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतलं आहे.

निरंजनने पाच रुपयांच्या बिस्किटांचा पुडा न विचारता घेऊन त्यातील दोन बिस्किटं खाल्ली. याचा राग आल्याने निवासी शाळेचे संस्थाचालक महाराज पवारने निरंजनला वायरने डोकं फुटेपर्यंत मारलं.

तीन दिवसांपूर्वी मुलाला त्याचे पालक भेटायला गेले असता हा प्रकार उघडकीस आली. निरंजनला 11 जुलैला मारहाण झाली होती. मात्र त्याच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत. 14 जुलैला निरंजनची आई पालक भेटीसाठी शाळेत गेली होती, त्यावेळी हा प्रकार तिच्या निदर्शनास आला.