Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा आज निकाल (Aurangabad Gram Panchayat Election Result 2022) लागणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील नऊ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशीच लढत पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा कोण मारणार हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. 


'या' ठिकाणी होणार मतमोजणी...



  • औरंगाबाद तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शहरातील हडको एन 12 भागातील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात होणार आहे. औरंगाबाद तालुक्यात एकूण 87.22 टक्के मतदान झाले आहे.

  • पैठण तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी पैठण तहसील कार्यालयातील बैठक हॉलमध्ये होणार आहे. पैठण तालुक्यात एकूण 86.64 टक्के मतदान झाले आहे.

  • फुलंब्री तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी फुलंब्री तहसील कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे.फुलंब्री तालुक्यात एकूण 87.00 टक्के मतदान झाले आहे.

  • सिल्लोड तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सिल्लोडच्या शासकीय तंत्रनिकेतन प्रशाला व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. सिल्लोड तालुक्यात एकूण 85.57 टक्के मतदान झाले आहे.

  • सोयगाव तालुक्यातील 04 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोयगावच्या पंचायत समितीच्या बचत भवन कार्यालय होणार आहे. सोयगाव तालुक्यात एकूण 86.11 टक्के मतदान झाले आहे.

  • कन्नड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयात होणार आहे.कन्नड तालुक्यात एकूण 87.70 टक्के मतदान झाले आहे.

  • खुलताबाद तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी खुलताबाद तहसीलदार यांच्या दालना समोरील परिसरात होणार आहे.  तालुक्यात एकूण 88.82 टक्के मतदान झाले आहे.

  • वैजापूर तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी वैजापूर तहसील कार्यालयातील सभागृहात होणार आहे. वैजापूर तालुक्यात एकूण 85.59 टक्के मतदान झाले आहे.

  • गंगापूर तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गंगापूरच्या तहसील कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये होणार आहे. गंगापूर तालुक्यात एकूण 84.12 टक्के मतदान झाले आहे.


ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटाची लढत!


शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटात जाणाऱ्या सार्वधिक आमदारांची संख्या औरंगाबाद जिल्ह्यातील होती. उद्धव ठाकरेंची साथ सोडून  औरंगाबादचे शिवसेनेचे पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीची निवडणूक जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिंदे गट की ठाकरे गट बाजी मारणार याचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये समोर येणार आहे.


राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल


राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी आहे. राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान पार पडले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे. मतमोजणी केंद्रावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सार्वत्रिक निवडणुकींमधून थेट संरपंचाची निवड करण्यात येणार आहे. आज गाववाड्यांना त्यांचे कारभारी मिळणार आहे. या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.