Amravati News अमरावती : अमरावतीच्या (Amravati News) राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी 11 जानेवारी 2022 च्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivaji maharaj) यांचा पुतळा स्थापन केला होता. मात्र तो पुतळा कुठलीही परवानगी न घेता बसविल्याने महानगरपालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तो अनधिकृत पुतळा पोलीस बंदोबस्तात (Amravati Police)हटवला होता. त्यावरून पालिका प्रशासन आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात मोठा वाद निर्माण होऊन बरेच राजकारण तापले होते.


उद्या 19 फेब्रुवारीला सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्याने, त्याच ठिकाणी परत एकदा शिवरायांचा पुतळा बसवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तशी जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. सोबतच, आज एकाच दिवसात उड्डाणपुलावर उंचवटा तयार करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्या उंचवट्या मागिले नेमके प्रयोजन काय हे जारी स्पष्ट नसले तरी शिवरायांच्यांच पुतळ्यासाठी ही लगबग सुरू असल्याचे बोलले जात आहे. 


पुतळ्याच्या वादावरून तापले होते राजकारण  


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आमदार रवी राणा यांनी स्वतः अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र परवानगी न घेता शिवरायांचा पुतळा बसविण्यात आल्याने अमरावती महानगरपालिकेने तो पुतळा हटवला होता. त्यानंतर रवी राणा यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत जाणीवपूर्वक पुतळा हटवण्यात आल्याचा आरोप केला होता. तर याच कारणावरून तत्कालीन महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती. या प्रकरणी रवी राणा यांच्यासह 12 ते 13 कार्यकर्त्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर हा वाद अमरावतीमध्ये सलग दोन महिने चालला. सोबतच या उड्डाणपुलावर दोन वर्ष सतत 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच उडानपुलावर ज्या ठिकाणी पूर्वी रवी राणा यांनी पुतळा बसवला होता त्या ठिकाणी उंचवटा तयार करण्याचे काम आज सकाळ पासून चालू आहे.


शिवरायांचा पुतळा बसणार तर पूर्ण परवानगी घेऊनच 


याबत महानगरपालिका प्रशासनाला विचारले असता, त्यांनी राजापेठ उडान पुलावर ट्राफिक आयलँड निर्मिती सुरू असल्याचे म्हटले आहे. तर पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी पुतळा बसणार नाही, असं सांगितलं आहे. दुसरीकडे याबाबत खुद्द आमदार रवी राणा यांना विचारले असता ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसणार तर पूर्ण परवानगी घेऊनच बसवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल. मात्र या ठिकाणी मध्यरात्री शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला जाणार, अशी जोरदार चर्चा सध्या परिसरात सुरू असून  राणा दाम्पत्याच्या कार्यकर्त्यांकडून त्याला सोशल मीडियावर दुजोरा देण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी शिवरायांचा पुतळा बसणार की नाही याबत साऱ्यांना उत्सुकता लागली आहे. 


इतर संबंधित बातम्या