अकोला :  काल मध्यरात्री एका दुचाकीला अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत दोन चुलतभाऊ असलेले युवक गंभीर जखमी झाले होते. मध्यरात्री अपघात झाल्यानंतर हे दोन्ही युवक रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडलेले होते. स्वप्नील आणि प्रशांत मोखळकर असं या जखमी युवकांचं नाव आहे. सख्खे चुलतभाऊ असलेले हे दोघेही यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातल्या लोही गावाचे रहिवाशी आहेत. दरम्यान, याचवेळी या मार्गावरून जात असलेले राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार डॉ. रणजीत पाटील यांना हे युवक दिसलेत. सर्वात आधी स्वत: अस्थी शल्यविशारद असलेल्या डॉ. पाटलांनी या दोघांवरही प्रथमोपचार केलेत. एवढ्या रात्री  या दोन्ही जखमी युवकांना कारंजा येथील तालुका ग्रामीण रूग्णालयात भरती केले. दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागण्यासह त्यांच्या हाडांनाही मोठा मार लागला होता. कारंजाच्या रूग्णालयात उपचार शक्य नसल्यानं डॉ. रणजीत पाटलांनी यंत्रणा हलवत दोन्ही तरूणांना तातडीनं यवतमाळला हलविण्यासाठी सूत्र हलवलीत. आता यवतमाळच्या एका रूग्णालयात या दोघांवरही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत यांच्या या कृतीचं मोठं कौतुक होत आहे. त्यांच्यातील राजकारण्यापलीकडच्या संवेदनशील देवदुत डॉक्टरचं दर्शन यानिमित्तानं घडल्याची भावना रूग्णांच्या कुटुंबिय आणि मित्र परिवारामध्ये आहे. 


...अन् त्यांच्यासाठी डॉ. रणजीत पाटलांच्या रूपाने 'देवदूत'च अवतरला :


   एरवी मध्यरात्रीनंतर 5 जूनचा दिवस संपला होता. बाराच्या ठोक्यानंतर 6 जूनचा दिवस सुरू झाला होता. मध्यरात्र झाल्याने बोदेगाव ते लोही मार्गावर गडद अंधार पसरला होता. रात्रीच्या या भयाण शांततेला चिरत दोन तरूणांचा आवाज मदतीसाठी टाहो फोडत होता. हे दोघेही तरूण एका अज्ञात वाहनाच्या धडकेनं रस्त्याच्या कडेला फेकले गेलेले होते. दोघांच्याही डोक्याला लागलेलं असल्याने मोठा रक्तस्त्राव झालेला होता. दोघांच्याही हाडांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालूक्यातल्या बोदेगाव ते लोही मार्गावर रात्री 12.30 दरम्यान घडली. जखमी झालेले दोन्ही युवक सख्खे चुलतभाऊ आहेत. स्वप्नील आणि प्रशांत मोखळकर असं या जखमी युवकांचं नाव आहे. हे दोघेही यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालूक्यातल्या लोही गावाचे रहिवाशी आहेत. 


      दरम्यान, याचवेळी या मार्गावरून राज्याचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील जात होते. राष्ट्रवादीचे माजी आमदार ख्वाजा बेग यांचा मुलगा तकीच्या लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून ते अकोल्याकडे निघाले होते. डॉ. पाटील यांना अपघातग्रस्त तरूण रस्त्यावर पडलेले दिसल्यामुळे त्यांनी चालकाला तातडीने वाहन थांबवायला लावलं. त्यांनी आपला चालक आणि सुरक्षारक्षकाच्या सहायानं दोन्ही युवकांना तात्काळ आपल्या वाहनात टाकत कारंजाच्या ग्रामीण रूग्णालयाकडे भरधाव वेगाने आपलं वाहन घेतलं. कारंजातील आपले कार्यकर्ते आणि आरोग्य यंत्रणेला आधीच कल्पना देत सजग केल्याने गेल्याबरोबरच  या दोघांवरही उपचार सुरू झालेत.  


आमदार रणजीत पाटलांमधील 'डॉक्टर' जागृत होतो तेव्हा :


अपघात झालेले दोन्ही तरूण रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले तेंव्हा आमदार डॉ. रणजीत पाटलांनी तातडीनं पावलं उचललीत. त्या दोघांवर त्यांनी सर्वात आधी तिथेच प्रथमोपचार केलेत. लगेच तातडीनं आपल्या गाडीनं कारंजाला रूग्णालयात दाखल केलं. रूग्णालयात स्वत: पुढाकार घेत दोन्ही रूग्णांवर उपचार केलेत. यावेळी रूग्णालयात उपस्थित कर्मचारी आणि डॉक्टरांना उपचार करतांना मार्गदर्शनही केले. दोन्ही रूग्णांची गंभीर परिस्थिती पाहता त्या दोघांनाही पुढील उपचारासाठी यवतमाळला रवाना करतांनाच तिथेही त्यांच्यावर त्वरीत उपचार होण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. 


मोखळकर कुटुंबियांकडून डॉ. रणजीत पाटलांचे आभार :


लोहीच्या मोखळकर कुटुंबियांसाठी डॉ. रणजीत पाटील जणू देवदुतच ठरले आहेत. आमदार डॉ. रणजीत पाटलांच्या या 'जीवनदायी' मदतीमुळे ते नि:शब्द झाले आहेत. त्यांनी अगदी वेळेवर केलेल्या मदतीमूळेच आपली दोन्ही मुलं वाचल्याची कृतज्ञता मोखळकर कुटूंबियांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना व्यक्त केली आहे. यासोबतच यवतमाळात उपचार घेत असलेल्या या दोन रूग्णांची विचारपूस करण्यासाठी त्यांनी चार-पाचदा फोन केल्याचंही मोखळकर कुटुंबियांनी सांगितलंय. 


दोन रूग्णांचा जीव वाचवू शकलो याचा आनंद शब्दांपलिकडचा : आमदार डॉ. रणजीत पाटील


दरम्यान, या दोन रूग्णांचा जीव आपण वाचवू शकलो याचं समाधान आणि आनंद शब्दांपलिकडे असल्याचं आमदार डॉ. रणजीत पाटील म्हणालेत. राजकारणी, आमदार, माजी राज्यमंत्री असण्याअधी आपण एक संवेदनशील डॉक्टर आहोत. त्याच भावनेतून कायम काम करण्याचा प्रयत्न असतो. कोणत्याही अपघातानंतर अपघातग्रस्त रूग्णांना रूग्णालयात पोहोचविण्यापुर्वीचे 'गोल्डन अवर्स, गोल्डन पिरियड' फार महत्वाचे असतात. त्यामूळेच नागरिकांना कोणतीही भिती न बाळगता अपघातग्रस्तांना मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे. यातून अनेक लोकांचे जीव वाचविण्याचं पुण्यकर्म आपण करू शकतो असंही ते म्हणालेत. 


आमदार असतांनाही सुरू आहे डॉ. रणजीत पाटलांची 'ओपीडी' :


डॉ. रणजीत पाटील विदर्भातील नावाजलेले अस्थिरोगतज्ञ आणि शल्यविशारद आहेत. त्यांचं अकोल्यातील जठारपेठ भागात स्वत:चं 'विठ्ठल हॉस्पिटल' आहे. 2010 मध्ये पहिल्यांदा अमरावती पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतरही त्यांनी आपल्या रूग्णसेवेत खंड पडू दिला नाही. ते ठराविक वेळेत आपली रूग्णसेवा करीत होते. 2014 मध्ये त्यांची वर्णी देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात लागली. ते गृह, नगरविकास अशा प्रमुख खात्यांसह तब्बल 13 खात्यांचे राज्यमंत्री होते. या काळात कामाच्या व्यापामूळे त्यांना नियमित रूग्णसेवा करता आली नाही. मात्र, 2019 पासून ते नियमितपणे आपल्या रूग्णालयात सकाळी 11 ते 3 या वेळात आपली 'ओपीडी' करतात. मागच्या अडीच वर्षांत त्यांनी महात्मा फुले अपघात विमा योजनेतून अनेक रूग्णांवर उपचार केले आहेत.