Sangamner Success Story : तीन भाऊ, एक शेतकरी, दुसरा डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ तर तिसरा जलसंधारण विभागात अधिकारी...या तिघांनी मिळून 25 एकरात लाल सोनं पिकवलंय. घाम गाळत, तंत्रज्ञानाची कास धरत आणि निर्धाराच्या बळावर ते आता कोट्यधीश होणार आहेत. कारण लवकरच टोमॅटोचे उत्पादन सुरु होणार असून आज टोमॅटोचे दर पाहता या बळीराजाला करोडपती होण्याचा मान मिळेल हे मात्र नक्की. ही संघर्षगाथा आहे, संगमनेर तालुक्यातील सोनूशी गावच्या गीते बंधूंची.  


संगमनेर तालुक्यातील सोनूशी हे गाव. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या परिसरात गीते परिवाराने शेतीत वेगवेगळे प्रयोग करत नवीन नवीन तंत्रज्ञान अवगत करत टोमॅटोची बाग फुलवली आहे. 14 जणांचे कुटुंब असलेलं हे गीते परिवार. भाऊसाहेब शेतीत, डॉ. लहानु हे डीआरडीओ संस्थेत शास्त्रज्ञ तर हरिभाऊ जलसंधारण विभागात अभियंता पदावर कार्यरत आहेत. तीन भावांच्या या कुटुंबात दोन भाऊ सरकारी सेवेत, तर एक भाऊ शेती व्यवसायात. मात्र आपल्या शेती करणाऱ्या भावाच्या खांद्याला खांदा लावून हे दोन्ही भाऊ शेतीत लक्ष घालतात. पावसाने पाठ फिरवल्याने काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट समोर असताना या कुटुंबाने आपल्या टोमॅटो पिकाला दररोज 30 ते 40 हजार खर्च करत टँकरने पाणी देत गीते परिवारांना टोमॅटोची बाग फुलवली आहे. 


गेल्या पंचवीस वर्षांपासून फक्त टोमॅटोचे उत्पादन हेच एक ध्येय गीते परिवाराने ठेवलं. कधी चांगला भाव मिळत होता तर कधी खर्चही निघणे अवघड, मात्र तरीसुद्धा गीते परिवाराने टोमॅटोची शेती सोडली नाही. यावर्षी जेव्हा मे महिन्यात शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत होते. त्याच काळात गीते परिवाराने टोमॅटोची लागवड केली. पाऊस वेळेवर येईल ही अपेक्षा ठेवली मात्र पावसाने दगा दिला. अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. त्यातच 2 एकर जागेत असणाऱ्या शेततळ्यात पाणी राहिले नसल्याने गीते कुटुंबाला टँकरने पाणी घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. दररोज 3 हजार रुपये दराने 12 ते 13 टँकर पाणी आणून गीते परिवाराने आज टोमॅटोची बाग फुलवली आहे.


22 दिवसांपासून टँकरने पाणीपुरवठा 


एकीकडे पाण्याचा खर्च तर दुसरीकडे मजुरांचाही खर्च दररोज होता. त्याशिवाय खते, फवारणी हा खर्च सुद्धा वाढला. आज भाव चांगला असल्याने शेतीत फायदा होईल, अस मत भाऊसाहेब गीते यांनी व्यक्त केले. सरकारी सेवेत सायटिंस्ट म्हणून काम करणारे लहानु गीते हे सुद्धा शेती कामात आपल्या मोठ्या भावाला मदत करतात. शेतीत आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर बियाणे निवडण्यापासून ते जे चांगलं आहे, ती माहिती देऊन ती राबवतो. आधी शेती पावसावर अवलंबून होती, मात्र काही वर्षांपूर्वी 2 एकरवर शेततळे उभारले. पूर्ण 25 एकर शेती ड्रीपवर आणली, असे अमूलाग्र बदल करत शेतीत फायदा होत गेला. यावर्षी पावसाने दगा दिला, त्यात शेततळ्यात असलेलं पाणी संपलं, अशा वेळी टँकर आणून पाणी दिलं. यावर्षी बाजार चांगला असल्याने आम्हाला ते परवडेल अस वाटत. यावेळी 25 एकरमधून 35 हजार क्रेट उत्पादन होईल, अस वाटतं तर आजचा बाजारभाव पाहिला तर 2 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकरी गीते कुटुंबाने व्यक्त केली आहे. 


मात्र टोमॅटोची शेती सोडली नाही.... 


जलसंधारण विभागात अभियंता पदावर शासकीय नोकरी करणारे हरिभाऊ गीते न चुकता वीकेंडला आपल्या भावाच्या मदतीला गावी येतात. "मी जलसंधारण विभागात काम करतो. मात्र माझ्याच भागात दुष्काळ हटवू शकत नाही, याच वाईट वाटतं. मात्र शेतीत भावाला जी मदत पाहिजे ती करतो," असे ते म्हणाले. तर सुमन गीते म्हणाल्या की, "गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोची शेती करतोय. आज तिन्ही भाऊ वडिलांची शेती सांभाळतात, याचा आनंद आहे. मी सुद्धा अनेक वर्षांपासून शेतीत काम करते. कधी भाव मिळतो तर कधी मिळत नाही. मात्र टोमॅटोची शेती सोडली नाही." एखादा व्यावसायिक मोठा झाला, तर शून्यातून उभे केले म्हणणारे लोक शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला तर महागाई वाढली, असं म्हणतात. मात्र शेतकऱ्यांचे कष्ट तो पाहत नाही. आज गीते परिवारातील तिन्ही भाऊ तीन ठिकाणी काम करत असले तरी वडिलांनी जोपासलेली शेती आजही तिन्ही भाऊ एकत्रित सांभाळत आहेत. यावर्षी टँकरने पाणी देण्याची वेळ आली असली तरी आजच्या भावामुळे गीते कुटुंबाला मोठा आर्थिक फायदा होईल हे मात्र नक्की आहे.


असा आहे टोमॅटो शेतीचा प्रवास 


दरम्यान गीते कुटुंबाने 25 एकरवर सिंजेटा 6242 या वाणाची लागवड केली आहे. मे महिन्यात लागवड केल्यानंतर आता हार्वेस्टिंग सुरु आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने आणि शेततळ्यात पाणी संपल्याने गेल्या 22 दिवसांपासून दररोज 12 ते 15 टँकरने शेतीला पाणी दिले जात आहे. यासाठी एक टँकर 3 हजार रुपये याप्रमाणे दररोज 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च होत आहे. यापूर्वी दोनदा टँकरने पाणी दिले होते. शेतीत 4 कोटी लिटरचे 2 एकरात शेततळे बांधण्यात आले आहे, मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने शेततळे कोरडे ठाक होण्याच्या मार्गावर आहे. यावर्षी 35 हजार क्रेट उत्पादन होण्याची आशा असून 2 हजार रुपये क्रेट आजचा भाव असल्याने चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2018 मध्ये सुद्धा शेतीतून सव्वा कोटींचे उत्पन्न घेतल्याचे गीते म्हणाले. 


VIDEO : Tomato Sangamner Special Report :नोकरी सांभाळत शेतीला दिला नवा आयाम, भावांनी मिळून पिकवलं 'लाल सोनं'