Success Story एकीकडे शेती परवडत नाही म्हणून युवक शेतीकडे वळण्यास धजावत नाहीत. मात्र नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील संतोष रायकर या शेतकऱ्याला चार एकरात डाळिंबाच्या बागेतून तब्बल 51 लाखांचे उत्पन्न मिळवत नव्या घराचे स्वप्न पूर्ण केलंय. विशेष म्हणजे ज्या डाळिंबाच्या पिकातून आपली आर्थिक प्रगती झाली, त्या झाडाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी झाडाची प्रतिकृती घरावर साकारली आहे. 


डाळिंब पिकातून चांगलं उत्पन्न मिळाल्याने या शेतकऱ्यांना नव्या घराचे स्वप्न पूर्ण करत आर्थिक प्रगती साधली आहे. वडीलोपार्जित जमिनीवर पारंपारिक पिकाला फाटा देत डाळिंबाची बाग करायची ठरवत या शेतकऱ्यानं धाडस केलं. आता अवघ्या चार एकरात डाळिंबातून त्यांना 51 लाख उत्पन्न मिळालय.


डाळिंबाच्या पैशातून उभारली इमारत 


श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील रायकर कुटुंबाची चार एकर वडिलोपार्जित जमीन आहे. या क्षेत्रावर हे कुटुंब पूर्वीपासून पारंपरिक पीक घेत होते. पण म्हणावे तसे उत्पन्न न मिळाल्याने गावातील इतर शेतकऱ्यांनी डाळिंब शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवल्याचं संतोष रायकर यांना दिसलं. पारंपरिक पिकांऐवजी डाळिंब लावून पाहू असं म्हणत चार एकरावर त्यांनी डाळिंब बाग उभा केली. यातून त्यांना 51 लाखांचे उत्पन्न मिळालं. या डाळिंबाच्या मिळालेल्या पैशातून त्यांनी नवी इमारत बांधली आहे. 


"शेती परवडत नाही अशी ओरड करणारे अनेक शेतकरी पाहायला मिळत असताना पारंपरिक शेती ऐवजी थोडी वेगळी वाट निवडून वेगळं करू पाहणारे युवा शेतकऱ्यांनाही नक्कीच शेती परवडू शकते असं म्हणत युवा शेतकऱ्यांनी शेतीकडे वळायला हरकत नाही." असं संतोष रायकर यांचा मुलगा ओंकार रायकर यांना म्हटलं.


घराचं स्वप्न केलं पूर्ण, कृतज्ञता म्हणून घरावर कोरलं डाळिंबाचे झाड 


अनेक दिवसांपासून स्वतःचे घर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. डाळिंब शेतीतून मिळालेल्या उत्पन्नामधून संतोष रायकर या युवा शेतकऱ्यांनं नव्या घराचे स्वप्न पूर्ण केलं. डाळिंब शेतीतून आर्थिक प्रगती झाल्याने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डाळिंबाच्या झाडाची प्रतिकृती या शेतकऱ्यांना घरावर साकारली आहे. गावात सगळीकडे हा चर्चेचा विषय ठरलाय. परिसरातील काही शेतकऱ्यांना याचं अप्रूप वाटत असून पारंपरिक शेतीपेक्षा नवी वाट निवडण्यास बळ मिळालं आहे.


हेही वाचा:


10वी पास शेतकरी केळी उत्पादनातून कमावतो दरवर्षी 70 लाख रुपये! ही तर इंजिनियरपेक्षाही अधिक कमाई


मोठी बातमी! 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये, मंत्री धनंजय मुंडेंची माहिती, 31 ऑगस्टपूर्वी पैसे होणार जमा