अहमदनगर : एकीकडे आगामी निवडणुकांचा दृष्टीने सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असून राजकीय पक्षाकडून दौरे, पदयात्रा सुरु आहेत. यंदाच्या निवडणुकांत युवांचा आवाज घुमणार असल्याने आमदार रोहित पवार यांनी युवकांच्या प्रश्नांना हात घालत तब्बल 800 किलोमीटरचं युवा संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. कंत्राटी भरती, पेपरफुटी आदीसंह विविध प्रश्नांवर या यात्रदरम्यान विचारमंथन करण्यात येणार आहे. 


आमदार रोहित पवार येत्या 24 ऑक्टोबरपासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहे. ही यात्रा 800 किलोमीटरची पदयात्रा असून तब्बल 13 जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातून युवा संघर्ष यात्रेला सुरवात होणार असून 45 दिवसांचा प्रवास करून 7 डिसेंबर रोजी नागपूरला याची सांगता होईल. पुण्यातील महात्मा फुले वाडा येथून या यात्रेला सुरवात होणार आहे. त्यांनतर वढू तुळापूर येथे नतमस्तक होऊन, यात्रेचा शुभारंभ होईल. संतांच्या, महाराजांच्या भूमीतून यात्रा जाणार असून दररोज कमीत कमी 16 आणि जास्तीत जास्त 25 किमी असा पायी प्रवास असणार आहे. या पदयात्रेचा एक भाग म्हणून, आमदार रोहित पवार इतर असंख्य युवांसोबत पुणे ते नागपूर अशी पदयात्रा करतील आणि राज्यातील तरुण-तरुणींना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी जनतेशी संवाद साधतील. संपूर्ण पदयात्रेदरम्यान, युवांना त्यांची मतं आणि अपेक्षा व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.


या पार्श्वभूमीवर रोहित पवार म्हणाले की, ‘युवा संघर्ष यात्रा’ ही युवांच्या नेतृत्वाखालील एक चळवळ आहे, ज्याचा मूळ उद्देश महाराष्ट्रातील युवांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जनसमर्थन एकत्रित करणे आणि युवा वर्गाचा आवाज शासनापर्यंत पोहचवणे हा आहे. आज युवा म्हणून संवाद साधत आहे. ज्या दिवसापासून राजकारणात आलो, तेंव्हापासून युवांचे प्रश्न मांडणे अन त्यांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न करत आलो आहे. मतदारसंघाप्रमाणेच युवांच्या प्रश्नांना ही प्राधान्य मांडले आहे. कंत्राटी भरती, पेपरफुटी, शाळा दत्तक देण्याचा निर्णय आदी प्रश्नावर आवाज उठवला जाणार आहे. त्याचबरोबर आजच्या राजकारणाची परिस्थिती पाहता युवा नेत्यांनी राजकारणात आलो ही चूक झाली का? किंवा नव्या पिढीने राजकारणात यावं की नाही?  असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. 


असा असणार युवा संघर्ष यात्रेचा प्रवास 


राष्ट्रवादी शरद गटाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून युवा संघर्ष यात्रेला येत्या 24 ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार आहे पुण्यातून या यात्रेला सुरुवात होईल पुणे ते नागपूर असा हा 800 किलोमीटरचा प्रवास असणार आहे एकूण 45 दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप 7 डिसेंबर रोजी होणार आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Rohit Pawar : टोलवरुन प्रश्न विचारणाऱ्या मराठी अभिनेत्रीचे सोशल अकाऊंट्स टार्गेट, ट्रोल गँग वापरुन किती खालची पातळी गाठणार, रोहित पवार आक्रमक