अहमदनगर : 'धनगर-मराठा समाज लहान-मोठा भाऊ नाही तर एका रक्ता मासांचे आहोत. तुम्हाला घटनेत आरक्षण दिलेले असताना तुम्हाला आरक्षण कसं मिळत नाही, याचं आश्चर्य वाटतं. तुम्हाला सावध व्हावं लागेल, आता धनगर समाज बांधवानी पेटून उठा, मराठा बांधव धनगर समाजाच्या मागे उभा राहील', असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. 


अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर आरक्षण दसरा मेळावा आयोजित करण्यात आलेला असून याठिकाणी मनोज जरांगे बोलत होते. ते यावेळी म्हणाले की, धनगर समाजाला तीन आरक्षण असून तुम्हाला मिळेना हे ऐकल्यावर मला तर कसतरी वाटलं. तुम्हाला तीन आरक्षण आहेत पण आम्हाला एक पण नाही. आम्हाला संध्याकाळपर्यंत आरक्षण मिळेल अशी आशा आहे. मात्र त्यांच्याकडे विमान आहे, ते इकडून-तिकडून जाऊन लगेच येतात. मात्र आरक्षण देण्यासाठी इतकी टाळाटाळ करत आहेत, आता सरकारला दिलेली मुदत संपत आली आहे. त्यांचे फोन येत आहेत, अभ्यासाला वेळ पाहिजे म्हणून पण मी आम्ही नकार दिला. आतापर्यंत अभ्यास खूप झाला,  काय वाचतेत कुणास ठाऊक, पण आता आज सायंकाळपर्यंत मुदत आहे, ती संपलं की विषय संपला असा इशाराच मनोज जरांगे यांनी यावेळी दिला. 


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनगर-मराठा समाज लहान-मोठा भाऊ नाही, तर एका रक्ता मासांचे आहोत. धनगर समाज बांधवाना घटनेत आरक्षण दिलेले असताना तुम्हाला आरक्षण कसं मिळत नाही, याचं आश्चर्य वाटतं. पण आता तुम्हाला सावध व्हावं लागेल, मराठा बांधव धनगर समाजाच्या मागे उभा राहील. मला माझ्या जातीशी दगाफटका करता आला असता पण मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे. त्यामुळे आरक्षण मिळवणायसाठी जीवाचं रान करा, लेकरांच्या भल्यासाठी आपल्याला करावे लागणार आहे. आता धनगर समाज बांधवानी पेटून उठा, मराठा बांधव धनगर समाजाच्या मागे उभा राहील', असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. 


तर धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी 21 दिवस उपोषण करणारे सुरेश बंडगर म्हणाले की सरकारने धनगर आरक्षणासाठी 50 दिवसांची मुदत मागितली आहे, ती मुदत संपत असताना सरकारकडून कोणतेही हालचाल होत नाही. त्यामुळे आता मुदत संपल्यानंतर आणखी लढा तीव्र केला जाईल असा इशारा त्यांनी दिला. तर उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर म्हणाले की, आरक्षण मुद्द्यावर ज्यांनी ज्यांनी आंदोलन केली, ते वेगवेगळ्या प्रलोभनाला बळी पडले. ते आंदोलक प्रलोभनाला बळी पडल्यानेच आतापर्यंत धनगर आरक्षण मिळाले नाही. मात्र यशवंत सेना ही धनगर आरक्षण लढाई शेवटपर्यंत लढेल. ही लढाई काही मंत्रिपद, राजकिय पद मिळवण्यासाठी लढत नाही. भोळ्या भाबड्या धनगर समाजाला न्याय देण्यासाठी हा लढा सुरू आहे. आता मुदत लवकरच संपणार असून 51 व्या दिवशी पुढची दिशा आम्ही ठरवणार असल्याचे देखील ते म्हणाले. तर आंदोलक बाळासाहेब दोडतले यांनी झिरवाळ आणि गावित यांना इशारा देत म्हटलं कि 
धनगर आरक्षणाच्या आड येऊ नका, अन्यथा गाठ धनगरांशी आहे. 


अन् मनोज जरांगे थांबले.... 


आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे धनगर आरक्षण मेळाव्यासाठी चौंडीत दाखल झालं होते. सुरवातीला त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळास अभिवादन करून सभास्थळी गेले. यावेळी मनोज जरांगे पाटील मंचावर चढताना काही काळ थबकले. मंचावर राजकिय नेते उपस्थित असल्याने काहीकाळ मंचाच्या खालीच थांबले. दसरा मेळाव्याच्या आयोजकांनी स्वतः येऊन आलेले राजकीय नेते हे धनगर बांधव म्हणून आलेले आहेत. राजकीय पक्षाचे  पदाधिकारी म्हणून आलेले नाहीत, असं सांगितल्यावर मनोज जरांगे मंचावर चढले.


इतर महत्वाची बातमी : 


आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस! 'आता पुढचं आंदोलन कसं तर, जरांगे पाटील सांगतील तसं', आज मनोज जरांगे अहमदनगरमध्ये!