अहमदनगर : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर झालेला हल्ला सुपारी देऊन करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पंधरा हजार रुपयांत कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्याची सुपारी देण्यात आली होती. दरम्यान, एखाद्याच्या आयुष्याची किंमत ही केवळ पंधरा हजार रुपये आहे का? याचं आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचं हेरंब कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी अहमदनगर (Ahmednagar) शहरातील रासनेनगर परिसरातील तरुणांनी गाडी आणून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना समोर आली होती. 


हल्ला करण्यासाठी 15 हजार रुपयांची सुपारी


या प्रकरणात पानटपरी चालकाचा समावेश असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर हल्ला करण्यासाठी 15 हजार रुपयांची सुपारी देखील देण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अतिक्रमणात (Encroachment) असलेली पानटपरी काढून टाकण्यासाठी कुलकर्णी यांनी महानगरपालिकेत अर्ज केला होता. त्यानुसार महापालिकेने कारवाई देखील केली होती. त्याचा राग मनात धरून संशयित अक्षय सब्बन याने त्याच्या पाच साथीदारांचा कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला होता.


समाजाला विचार करायला लावणारी बाब


ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला (Attack) झाला होता, धक्कादायक म्हणजे केवळ पंधरा हजार रुपयांची सुपारी घेऊन त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात समोर आला आहे. एखाद्याच्या आयुष्याची किंमत ही केवळ 15000 रुपये आहे का? याबाबत आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचं हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर माझ्यावर हल्ला करणार पाच जण होते, म्हणजे पैसे वाटून घ्यायचे झाले तर, प्रत्येकाच्या वाट्याला केवळ तीन हजार रुपये येणार होते आणि 3000 रुपयांसाठी आजची तरुण पिढी एखाद्याच्या जीवावर उठत असेल, तर हे नक्कीच समाजाला विचार करायला लावणार आहे.


पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह


हल्ला करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मात्र तो मुलगा खरंच अल्पवयीन आहे का? याची देखील चौकशी करणे गरजेचे आहे, असे मत हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे. जर तो मुलगा अल्पवयीन असेल तर त्याच्याकडे दुचाकी आलीच कशी? संबंधित अल्पवयीन मुलाला बालसुधार गृहामध्ये का पाठवण्यात आलं नाही? असा सवाल हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. 


हल्ला मागचं कारण काय? 


संशयित अक्षय सब्बन याची सिताराम सारडा शाळेजवळ पान टपरी होती. या टपरीला मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी हरकत घेतली. त्यांच्या तक्रारीवरून महापालिकेने टपरी हटवली होती. त्यामुळे पोलिसांचा सब्बन याच्यावर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, तो माहिती देत नव्हता. सीसीटीव्हीत हल्लेखोरांचे दुचाकीवर फोटो मिळाले होते. या फुटेजमधील एका आरोपीसारखा दिसणारा मुलगा शहरातील कोंड्या मामा चौकात राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर इतर संशयितांची नावे पुढे आली.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Heramb Kulkarni :  लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना बेड्या, पान टपरीचालकासह इतर दोघांना अटक