बुलडाणा: बुलडाणा जिल्हयातलं लोणार सरोवर प्रसिद्ध आहे. याच परिसरात वडगाव तेजन हे छोटंसं गाव आहे, शिरसाट पिता-पुत्र इथले प्रगतशील शेतकरी. त्यांनी  शेतीला शेळी पालनाची जोड दिली. यातून महिन्याला 50 हजार रुपये निव्वळ नफा त्यांना मिळतोय.


राजीव शिरसाट यांच्याकडे वडिलोपार्जित 15 एकर जमीन आहे. यामध्ये ते रब्बी आणि खरीपाची पिके घेतात.

राजीव हे सरकारी नोकरीत आहे. मात्र शेतीचीही त्यांना आवड आहे. मात्र केवळ कोरडवाहू शेतीवर अवलंबून न राहता त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन सुरु केलं.

नोकरीसोबतच 2009 मध्ये त्यांनी शेळीपालनाचा जोडधंदा सुरु केला. आजच्या घडीला त्यांचा व्याप वाढला असून, त्यांच्याकडे 100 बकरी, 5 बोकड आणि 60 पिल्ले आहेत.

विशेष म्हणजे हे कुरबानीसाठी स्पेशल बोकड तयार करण्यात यांचा हातखंडा आहे. आज त्यांच्याकडे पावणे दोनशे किलोचे कुर्बानीचे बोकड आहे. या दोन्ही बोकडांची किंमत तीन लाख इतकी अपेक्षित आहे.

तर पुढल्या वर्षी असे 15 कुरबानी बोकड ते तयार होतील.

 बकऱ्यांचं गणित

एक बकरी वर्षाला सरासरी 4 पिल्लं देते. एका वर्षात 100 शेळ्या, अडीचशे पिल्ले अशी सरासरी साडेबारा लाखांची उलाढाल होते.

याशिवाय वर्षाकाठी 40 ट्रॉली इतकं सकस लेंडी खत मिळतं. त्यापासून सुमारे 1 लाखांचं उत्पन्न जमा होतं.

यातून शेळ्यांच्या खुराकावर अडीच लाख, मनुष्यबळ 2 लाख, लसीकरण-डॉक्टर देखभाल 1 लाख 30 हजार, किरकोळ खर्च 40 हजार, भांडवली तूट 50 हजार असा 6-7 लाख खर्च जाता सहा लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळतं.

म्हणजेच 100 शेळ्यांपासून राजीव शिरसाठ यांना वर्षाकाठी 6 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळतं. म्हणजेच महिन्याकाठी 50 हजार उत्पन्न मिळतं.

याशिवाय कुर्बानीसाठी तयार केलेल्या बोकडांना मिळणारी किंमत वेगळीच असते.

शेळीपालन आणि नियोजन

शेळीपालनासाठी योग्य नियोजन आवश्यक असतं. गोठा साफ-सफाई करणे अत्यंत गरजेचे असते. तसेच बकरीला खुराक व्यस्थापन देखील या व्यवसायाच्या सफलतेसाठी अत्यंत गरजेचं आहे.

सकाळी प्रत्येक बकरीला चारशे ते पाचशे ग्रॅम खुराक द्यावा. त्यामध्ये मका आणि पशू खाद्य हे मिसळून त्यांना खायला द्यावं.

तसेच पिलांसाठी हेच खाद्य शंभर ते दीडशे ग्रॅम द्यावे. सायंकाळी त्यांना बकऱ्यांचं दूध पाजावं, पिल्ले पाजल्यानंतर पंचवीस बकऱ्यांसाठी एक डाला म्हणजेच तीस किलो वाळलेला चाराचा खुराक द्यावा.

शेळ्यांचं लसीकरण 

शेळ्यांना लसीकरण सर्वात महत्वाचे आहे. प्रत्येक बकरीचे नियमित लसीकरण झालेच पाहिजे.

त्यात ईटीव्ही आणि टीटीआर या रोगप्रतिबंधात्मक लसी द्यायलाच हव्या. त्यामुळे शेळ्यांमधील साथीच्या रोगांना आळा बसतो.

जर एखादी शेळी रवंथ करीत नसेल तर ती आजारी आहे, असे समजावे आणि तिचे तापमान तपासून तिला गोळया इंजेक्शन द्यावेत.

उन्हाळ्यामध्ये बकरीला देवी या रोगाची लागण होत असते. यंदाचा उन्हाळा पाहता शेळ्यांची विशेष काळजी आवश्यक आहे.

शेळ्यांचा गोठा थंड  ठेवा. गोठा थंड पाण्याने स्वच्छ ठेवा.

नव्याने शेळीपालन करण्यांना सल्ला 

  • 5 ते 10 शेळ्यांपासून व्यवसाय सुरु केला तरी चालेल.



  • जवळच्या मार्केटमधून 10 गाबण शेळ्या घ्या. त्यापासून 2-2 पिल्लं मिळतील.



  • एक शेळी सुमारे दहा हजाराची असेल, तिची पिल्ल सहा महिन्यात 5-5 हजार देतात.



  • म्हणजेच एका शेळीपासून दहा हजार रुपये मिळतात.



  • मोठी, उंच, लंबी-लचकी अशा शेळ्यांचीच निवड करा. सुरुवातीला स्थानिक शेळ्याच घ्या.



  • स्थानिक बाजारातील शेळ्या घेऊन एक-दोन वर्ष यशस्वी पालन-पोषण केल्यानंतर,. शिरुई, जमनापुरी वगैरे शेळ्या घ्या. सुरुवातीलाच त्या घेऊ नका. त्यांचं पालन-पोषण, खर्च वेगळा असतो.


शेळ्यांपासून उत्पन्न

1 बकरी 2 वर्षातून 3 वेळा प्रसुत होते. 1 बकरीपासून 4 पिल्लं मिळतात. म्हणजे शंभर पिल्लापासून अडीचशे पिल्लं मिळू शकतात. अडीचशे पिलांचं 5 हजार भाव जरी पकडला तर सुमारे साडेबारा लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं.

याशिवाय शेळ्यांपासून लाखाचं लेंडी खत मिळतं.

VIDEO:   व्हिडीओसाठी क्लिक करा